पुणे- साहित्य-संस्कृतीच्या माध्यमातुन उपेक्षित समाजांत वैचारिक जागरण घडवण्याच्या हेतुने धनगर साहित्य परिषदेने यंदा लातूर येथे दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन आयोजित केले आहे. नऊ ते अकरा फेब्रुवारीपर्यंत भरणार असलेल्या या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, “हुमान” या विदारक आत्मकथनाने गाजलेल्या मालेगांव महापालिकेच्या आयुक्त श्रीमती संगीता धायगुडे असणार आहेत. संमेलनाचे उद्घाटक जेष्ठ साहित्यिक आणि रानकवी मा. श्री. ना. धो. महानोर हे या साहित्य संमेलनाचे उद्घाटक आहेत. अँड. श्री. आण्णारावजी पाटील हे या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत. समारोप सत्राचे अध्यक्ष म्हणून आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम साहित्यिक व थोर विचारवंत मा. डॉ. कांचा इलय्या – शेफर्ड हे लाभले आहेत. तर जेष्ठ साहित्यिक आणि ख्यातनाम विचारवंत संजय सोनवणी हे या संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत अशी माहिती धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री. जयसिंग तात्या शेंडगे यांनी दिली.
या संमेलनात साहित्य संस्कृती, माध्यमांची भुमिका, महिलांचे संस्कृतीतील योगदान, समाजासमोरील ज्वलंत प्रश्न अशा अनेक विषयांवर भरगच्च परिसंवाद आयोजित करंण्यात आले असुन सर्व समाजांतील महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत त्यात बोलणार आहेत. महाराष्ट्रातील सध्याच्या अस्वस्थ सामाजिक वातावरणात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कार्य आदिवासी धनगर साहित्य संमेलन करेल असा विश्वासही श्री. शेंडगे यांनी व्यक्त केला.
लातूर साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांना विविध सन्मानांनी गौरवण्यात येणार असून श्री. ना. धों. महानोर, कांचा इलय्या – शेफर्ड, महेश कोठारे आणि संजय सोनवणी यांना प्रत्येकी सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपयाचा जीवनगौरव व कृतज्ञता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सोलापुर येथे झालेल्या पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनानंतर लातूर येथे होणारे हे दुसरे सम्मेलन अत्यंत भव्य व वैचारिक दृष्ट्या सामाजिक भर घालणारे असेल असा विश्वासही श्री. शेंडगे यांनी व्यक्त केला.