हजारोंच्या उपस्थितीत १६ राज्यांत अंत्ययात्रा
दिल्ली- पुलवामा येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांवर त्यांच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशातील १६ राज्यांतील अंत्ययात्रांत या शहिदांना अंतिम निरोप देण्यासाठी लाखो लोक सहभागी झाले होते. भारतमाता की जय आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत हातात तिरंगा घेतलेल्या लोकांनी साश्रुनयनांनी या शहिदांना अंतिम निरोप दिला.
सर्व विरोधी पक्षांनी दहशतवादाच्या विरोधात एकत्र येत सुरक्षा दलांबरोबर खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे म्हटले आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरसह देशातील अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेतला. या बैठकीत भारत-पाक सीमेवरील परिस्थितीबाबतही चर्चा झाली. काश्मिरात सक्रिय अतिरेक्यांच्या धरपकडीसाठी आवश्यक ती पावले टाकण्याचे आदेश राजनाथ सिंह यांनी लष्कराला दिले. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृह सचिव राजीव गौबा आणि आयबीचे संचालक राजीव जैन उपस्थित होते.
कपिल शर्मा शोमधून सिद्धूला डच्चू
– पुलवामा हल्ल्यावरून पाकिस्तानच्या बाजूने नरमाई दर्शवणारे पंजाबमधील कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना सोनी वाहिनीवरील कपिल शर्मा शोमधून बाहेर काढण्यात आले.
– अनेक राज्ये व शहरांतील काश्मिरी युवकांना किरायाचे घर सोडण्याचे सांगण्यात आले. काश्मीरबाहेरील युवकांना मिळत असलेल्या धमक्यांमुळे सरकारने हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले.
– मुरादाबाद येथील एमआयटी फार्मसी कॉलेजमध्ये शिकत असलेल्या काश्मिरी विद्यार्थी मुदस्सीर गनी याने सोशल मीडियावर पाकच्या समर्थनार्थ पोस्ट टाकली. भाजयुमो कार्यकर्त्यांनी शनिवारी कॉलेजमध्ये गोंधळ घातला, विद्यार्थ्यांना मारहाण केली.
– बंगळुरू येथे काश्मिरी विद्यार्थी आबिद मलिक यानेही सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली. त्याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला.
राजौरी : आयईडी स्फोटात मेजर शहीद
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथे नियंत्रण रेषेवर शनिवारी झालेल्या आयईडी स्फोटात लष्करातील मेजर श्रेणीचे चित्रेश बिष्ट शहीद झाले. संरक्षण सूत्रांनी सांगितले, राजौरी जिल्ह्यातील लाम भागात नियंत्रण रेषेवर ही घटना घडली.
फुटीरवाद्यांची सुरक्षा हटवणार
पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयच्या संपर्कातील काश्मिरी फुटीरवादी नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात येणार आहे. केंद्राच्या सल्ल्यानुसार या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा राज्याचे गृह सचिव घेतील.
जवानांना विमानाने पाठवण्याचा प्रस्ताव गृहमंत्रालयात पडून
काश्मीरमध्ये तैनात दलास ने-आण करण्यासाठी १ जानेवारी २०१८ रोजी सुरू केलेली विमानसेवा ३१ जुलै २०१८ रोजी बंद झाली. ती पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव गृहमंत्रालयात चार महिन्यांपासून पडून आहे. ४ फेब्रुवारीला हिमवृष्टीमुळे जम्मूत अडकलेल्या जवानांना श्रीनगरला विमानाने पाठवण्याची परवानगी मागितली होती. मात्र, काहीच उत्तर न आल्याने १४ फेब्रुवारीला हा ताफा श्रीनगरला वाहनांनी रवाना झाला आणि हल्ला झाला.
शांघाय सहकार्य संघटनेची बैठक स्थगित :
दरम्यान या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शांघाय सहकार्य संघटनेच्या ८ देशांची २५ फेब्रुवारीला आयोजित बैठक रद्द करण्यात आली आहे. यात चीन व पाकिस्तान सदस्य आहेत.
प्रत्येक अश्रूचा हिशेब घेऊ : पंतप्रधान मोदी
शहीद कुटुंबीयांच्या प्रत्येक अश्रूचे योग्य उत्तर दिले जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पांढरकवडा (जि. यवतमाळ) आणि धुळ्यात दिला. भारत आता नवी धोरणे, रीतींचा देश आहे. जगाला याचा अनुभव येईल. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही. भारताच्या वाटेला कोणी आलेच तर त्याला सोडत नाही.
शहीद संजयसिंग राजपूत, नितीन राठोड यांना हजारोंच्या उपस्थितीत अंतिम निरोप
सिंदखेडराजा/ मलकापूर । पुलवामा जिल्ह्यात शहीद झालेले बुलडाणा जिल्ह्यातील चोरपांग्रा गोवर्धननगर येथील नितीन राठोड व मलकापूर येथील शहीद संजयसिंग राजपूत यांच्या पार्थिवावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन राठोड यांच्या चितेला मुलगा जीवनने मुखाग्नी दिला. तर, मलकापूर येथे शहीद संजयसिंग राजपूत यांच्या चितेला मुलगा जय याने मुखाग्नी दिला. या शूर सैनिकांना परिसरातील हजारो लोकांनी साश्रू निरोप दिला. या वेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आदी उपस्थित होते.
मुंबईत दुकाने बंद, रेल रोको
पुलवामा हल्ल्याच्या विरोधात शनिवारी निदर्शकांनी पालघर जिल्ह्यात नालासोपारा स्टेशनवर रेल रोको केला. यामुळे या मार्गावरील वाहतूक तीन तास बंद राहिली. निदर्शकांनी पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या. मुंबईत बहुतांश दुकाने बंद राहिली.
सर्व राजकीय पक्ष लष्कराच्या पाठीशी
सर्व राजकीय पक्षांनी दहशतवादाच्या विरोधातील लढ्यात एकी दाखवली. सरकारतर्फे आयोजित सर्वपक्षीय बैठकीला सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यांनी अतिरेकी हल्ला व त्याला सीमेपलीकडून मिळत असलेल्या मदतीचा निषेध केला. सर्वांनी लष्करासोबत उभे असल्याची घोषणा केली.
वायुसेनेचा निर्धार : कोठेही जाऊन हल्ल्यास सज्ज
– वायुसेना प्रमुख बीएस धनोआ म्हणाले, कोठेही जाऊन हल्ला करण्यास आम्ही सक्षम आहोत. आमच्या पायलटचा निशाणा अचूक आहे.
– वायुसेनेने पोखरण येथे युद्धसराव केला. अगदी दोन तासांत वायुसेना कोठेही हल्ला करू शकते या सरावात सिद्ध झाले.
जम्मू : संचारबंदी कायम
जम्मूमध्ये शनिवारी दुसऱ्या दिवशीही संचारबंदी लागू होती. लष्कराने शहरातून संचलन केले. हेलिकॉप्टर आणि ड्रोनद्वारे गस्त घालण्यात येत आहे. दरम्यान, जम्मू विद्यापीठातील सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या. जम्मू परिसरातील मोबाइल, इंटरनेट सेवा बंद आहे. दरम्यान, जम्मू-श्रीनगर महामार्गावर दरड कोसळल्यामुळे रामबन येथे अडकलेली वाहने कडक सुरक्षा व्यवस्थेत श्रीनगरकडे रवाना करण्यात आली.