मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अजित पवार यांची दादरमध्ये भेट झाली आहे. त्यामुळे मनसेला आघाडीसोबत घेण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. मनसेला आघाडीमध्ये घ्यावं की घेऊ नये यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये संभ्रमावस्था असतानाच अजित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच कालच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आगामी निवडणुकीत भाजपाविरोधातील मतांची धुव्रीकरण टाळण्यासाठी मनसेने आघाडीसोबत यावे, असे आवाहन केले होते. त्यानंतर आज मुंबईत अजित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं राष्ट्रवादी आणि मनसे यांची आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनसेला आघाडीबरोबर घेण्यासंदर्भात विचारणा केली असता अजित पवार म्हणाले होते की, ”प्रत्येक राजकीय पक्षाचा एक ठरावीक मतदार असतो. गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेच्या उमेदवारांनी लाख, दीड लाख मते घेतल्याचे समोर आले होते. मनसेसंदर्भात आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि काँग्रेसची मतभिन्नता असली तरी येत्या निवडणुकीत मोदी सरकारविरोधातील मतविभाजन टाळण्यासाठी मनसेला सोबत घेणं गरजेचं आहे. भाजपाचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणं आवश्यक आहे. त्यामुळेच मनसेनंही आघाडीबरोबर यायला हवं, असं वाटत असल्याचंही अजित पवार म्हणाले होते.