काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेत मोदी सरकारच्या पराभव होत असल्याचा दावा केला. राहुल गांधी यांनी बेरोजगारीसह शेतकरी, उद्योगधंदे अडचणीत असल्याने मोदींना लक्ष्य केले. मोदी या विषयांवर काहीच बोलत नसल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. या विषयांवर मोदींनी माझ्यासोबत 10 मिनिटे चर्चा करावी, फक्त अनिल अंबानींच्या घरी नाही, असेही राहुल यांनी आव्हान दिले.
राहुल गांधी म्हणाले, ”आमचे पहिले लक्ष्य भाजप आणि नरेंद्र मोदींना पराभव करण्याचे आहे. आम्हाला देशातील संस्था वाचवायच्या आहेत. भाजपचा पराभव होणार हे निश्चित आहे. बेरोजगारी हा देशासमोरील सर्वांत मोठा प्रश्न आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पहिला मुद्दा रोजगारी संदर्भात आहे. मोदी याविषयी शब्दही बोलत नाहीत, त्यांच्याजवळ कोणता मुद्दाच नाही. आज देशात कोठेही चौकीदार बोलले की चोर है असा शब्द येतो. मोदींना वाटते ते पराभूत होत आहेत, तसे ते नवे मुद्दे आणतात. गुजरातमध्ये त्यांनी सी प्लेन आणले होते. आता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे, ते पराभूत होत आहेत.”
लष्कर ही मोदींची खासगी संपत्ती नाही. सर्जिकल स्ट्राईक हे लष्कराने केले आहेत. काँग्रेसने केलेले सर्जिकल स्ट्राईकला मोदी व्हिडिओ गेम म्हणत असतील तर ते भारतीय लष्काराचा अपमान करत आहेत. मसूद अजहरला पाकिस्तानमध्ये कोणी पाठविले हे सांगावे. न्याय योजनेमुळे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. अनेक बेरोजगारांना आम्ही रोजगार देणार आहोत. युवकांना उद्योग सुरु करण्यासाठी तीन वर्षे कोणत्याही परवानगीची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयात राफेलचा मुद्दा सुरु असल्याने मी याविषयावर भाष्य केल्याने माफी मागितली. चौकीदार चोर है हा आमचा नारा आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
निवडणूक आयोग पक्षपाती
निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारल्यानंतर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार आल्यानंतर अनेक स्वायत्त आणि महत्त्वाच्या संस्था मोडीत काढण्याचे काम सुरू झाले असल्याचे आम्ही म्हटले होते. निवडणूक आयोगाने आपली जबाबदारी योग्य तऱ्हेने पार पाडायला हवी. पण तसे दिसत नाही. निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा हा भाजपने स्वायत्त संस्था ताब्यात घेतल्याचा परिणाम असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. निवडणूक आयोगाने कितीही भाजपला मदत केली तरी जनताच भाजपला हरवणार आहे असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.