मुंबई-मुंबईमध्ये आयोजित होणाऱ्या ‘सीएम चषक’च्या सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा महासंगम’ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करतील. या कार्यक्रमात सुमारे ५० हजारांहून अधिक तरुण-तरुणी भाग घेण्यासाठी मुंबईत येत आहेत. सायनच्या सोमैया ग्राउंडमध्ये आयोजित होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ४३ लाख स्पर्धकांपैकी निवडले गेलेले ५० हजार तरुण-तरुणी या सोहळ्यात सहभागी होतील. महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर व मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय यांनी ही माहीती दिली.
सीएम चषकाच्या या भव्य समारोहात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, क्रीडा व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, आमदार मंगलप्रभात लोढा, खासदार पुनम महाजन, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस अंतिम १२९ विजेत्यांना सन्मानित करतील. सीएम चषकच्या अंतिम सोहळा यशस्वी करण्यासाठी सोमैय्या ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. सीएम चषकची सांगता भव्य कार्यक्रमरूपाने व्हावी यासाठी कार्यकर्ते पूर्ण उत्साहाने एकत्र काम करताना दिसून येत आहेत. आमदार टिळेकर मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय यांच्या बरोबर प्रदेश भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये, युवा मोर्चाचे सरचिटणीस आमदार संतोष पाटिल दानवे व विक्रांत पाटील हे उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, सीएम चषकच्या एकूण १२ स्पर्धामध्ये राज्यभरातील सुमारे ४३ लाख स्पर्धकांनी भाग घेतला. यातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून ५० तरुण-तरुणी युवा महासंगम मध्ये सहभागी होतील. महाराष्ट्रात अनेक वर्षानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात युवा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ फेब्रुवारी सायन येथील सौमैया ग्राउंडवर सीएम चषक सांगता सोहळा पार पडणार असून यामध्ये यावेळी क्रीडा-सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या स्तरावर भव्य स्वरूपात आयोजित होणाऱ्या या ग्रँड फिनालेमध्ये कला-क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा गायक आदर्श शिंदे आपल्या आवाजात ‘सीएम चषक’साठी रचलेलं प्रसिद्ध गीत’घेऊन टाक’ गातील. कार्यक्रमाच्या प्रांगणात महाराष्ट्रातील सर्वात मोठी रांगोळी काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात येणार असून त्याचवेळी फॉर्म भरून या योजनांचा लाभ घेण्याची संधी गरजूंना मिळणार आहे. सोबतच तरुणाची आवड लक्षात घेऊन सेल्फी पॉईंटचे आकर्षण देखील य कार्यक्रमात असणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या कटाऊट सोबत फोटो घेण्याची संधी मिळणार आहे. तरुणांची विचारधारा लक्षात घेऊन या सोहळ्यात भाजपच्या जाहिरनाम्यामध्ये तरुणाचे विचार समाविष्ट करून घेण्यासाठी सूचना पेटी देखील ठेवण्यात येणार आहे.