पाणी चेंबरमध्ये बुडून कर्मचाऱ्याचा मृत्यू, शोधण्यासाठी गेले चार जण बेशुद्ध
मुंबई-मलबार हिल येथे पाण्याची लाईन सुरु करण्यासाठी चेंबरमध्ये उतरलेल्या एका महानगरपालिका कर्मचाऱ्याचा चेंबरमध्ये फसून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या कर्मचाऱ्याला शोधण्यासाठी एक एक करून चार कर्मचारी या चेंबरमध्ये उतरले होते. मात्र तेही तिथे पाण्यात फसले. या चेंबरमध्ये फसून राकेश निजप याचा मृत्यू झाला असून इतर चार जण बेशुद्ध अवस्थेत सापडले आहेत. मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. गावदेवी पोलीस ठाण्यात नाना चौकमध्ये घडलेल्या या दुर्घटनेची नोंद करण्यात आलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री तीन वाजता भायखळा येथील पाणी खात्यातील पाच कर्मचारी पाणी सुरू करण्यासाठी नाना चौक येथे आले होते. या पाच कर्मचाऱ्यांमधील राकेश पाणीची सप्लाय सुरु करण्यासाठी चेंबरमध्ये उतरला होता. खूप उशीर होऊनही राकेश चेंबरच्या बाहेर न आल्याने बाळासाहेब पवार, उमेश पवार, सुरेश पवार आणि शांताराम भक्ते राकेश याला शोधण्यासाठी चेंबरमध्ये उतरले. मात्र पाण्यात बुडाल्याने राकेशला शोधणे कठीण झाले होते. जवळपास अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर राकेशचा मृतदेह आणि इतर चार जणांना बेशुद्ध अवस्थेत चेंबरमधून बाहेर काढण्यात आलं. यानंतर त्यांना नायर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेची माहिती मिळताच मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा आणि स्थानिक नगरसेविका मीनल पटेल दुर्घटनास्थळी पोहोचले. यासोबतच मनपाचे बाबुला टँक नियंत्रणचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. शरीरात पाणी शिरून दम घटलेल्या चार कर्मचाऱ्यांचा नायर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. आमदार लोढा यांनी मृताच्या कुटुंबातील एकाला मनपात नोकरी मिळवुन देण्यासाठी सहाय्यता करण्याचे आश्वासन दिले आहे. आमदार लोढा यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची चौकशी केली आणि मृतकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले, तसेच नाना चौकवर जाऊन दुर्घटनास्थळची पाहणी केली. .