पाकिस्तानचा झेंडा जाळून केला पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध, कलम ३७० रद्दकरण्याची मागणी
मुंबई. भारतीय जनता पक्षाचे नेते मंगल प्रभात लोढा यांनी पंतप्रधानांशी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करावे, अशी मागणी करत मुंबईतील ग्रँट रोड येथील नाना चौकात पाकिस्तनचा झेंडा जाळला आहे. लोढा यांनी मुंबईतील जिन्ना हाउस येथेही पाकिस्तानचा झेंडा जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना थांबविले.
पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर आमदार मंगल प्रभात लोढा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याची मागणी केली असून जम्मू-काश्मीरमधील भारतीय सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे समस्त देशवासीयांच्या मनात संतापाची भावना असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानाच्या या भ्याड कृत्याची निंदा करत संपूर्ण देश आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपल्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची एक मजबूत प्रतिमा निर्माण झाली असून हे सिद्ध झाले आहे की, भारत एक अतिशय बलवान देश आहे आणि सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहे.
ताजा घडामोडींचा विचार करता आपणास विनंती आहे की, काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून तिथे व्यावसायिक आणि औद्योगिक विकासासाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी, जेणेकरून तेथील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होईल. कलम ३७० रद्द करणे ही काळाची मागणी आहे. या मागणीकडे विशेष लक्ष द्या अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली आहे. आपण आजवर देशाच्या हितासाठी अनेक कठीण निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे देश अधिक बळकट आणि सक्षम झाला आहे. आपल्या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील तरुणांना रोजगार सोबतच विकासाची एक नवीन दिशा मिळेल, तसेच काश्मीर मधील ३७० कलम रद्द केल्याने कोट्यावधी भारतीयांची वर्षानुवर्षापासून असलेली मागणीला न्याय मिळणार असल्याचे ते म्हटले आहे.
पाकिस्तानी अतिरेक्यांच्या या भ्याड कृत्याचा निषेध करण्यासाठी आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिक आपला रोष व्यक्त करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी जमलेल्या नागरिकांनी पाकिस्तान विरोधी घोषणा देत आपला रोष व्यक्त केला असून पंतप्रधानांना पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली आहे.