पुणे-देशातील सत्ताधारी पक्षाला हुकुमशाही आणायची आहे. त्यांचा आदर्श हिटलर आणि मुसोलिनी आहे. तर त्यांना मनुवादी हिंदू धर्माचे राज्य आणायचे असून या सरकारने केवळ भांडवलशाही मजबूत करायची कामे केली आहे. देशातील सर्वसामन्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष नाही. अशा शब्दात निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला. तसेच सत्ताधारी राजवटीला राज्यघटना अमान्य असल्याचेही ते म्हणाले. मतदार जागृती परिषद आयोजित ‘लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान’ या विषयावरील सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी होते, तर स्वामी अग्निवेश, तीस्ता सेटलवाड, गिरीधर पाटील, निरंजन टकले यावेळी उपस्थित होते. यावेळी पी.बी. सावंत म्हणाले, आगामी निवडणूक लक्षात घेता विरोधकांनी एकत्र येऊन आपत्ती दूर केली नाही. विरोधी पक्षांनी योग्य उमेदवार निवडावे. असे सांगत त्यांनी विरोधी एकजुटीला मत देण्याचे आवाहन केले.
स्वामी अग्निवेश म्हणाले, ‘ आतंकवादाच्या मुळाशी गेले पाहिजे. जो निष्काळजीपणा झाला त्याची चौकशी झाली पाहिजे. मोदींनी सुरक्षिततेबाबत जे दावे गेले ते खोटे ठरले. शहीद जवानांमध्ये शेतकऱ्यांची मुले आहेत. नेत्यांची मुले नाहीत . देश रक्षणाची जबाबदारी फक्त शेतकरी, गरीब कुटुंबांची आहे का ?
या संघर्षाला धार्मिक रंग देता कामा नये.विरोधी पक्षांना घेऊन सिक्युरिटी कौन्सिल स्थापन करुन एकत्रितपणे मुकाबला केला पाहिजे.एल्गार परिषदेनंतर पंतप्रधान हत्येचा कट रचल्याची आवई उठविण्यात आली. न्या.पी.बी. सावंत यांच्यासारख्या आदरणीय व्यक्तिमत्वाला एल्गार परिषदेशी जोडण्याचा प्रयत्न झाला. अखलाख ची हत्या,मॉब लिंचिंग हा दहशतवाद नाही का ? अशा घटनातील कोणालाच शिक्षा झाली नाही.गोहत्या विरोधात हिंसा करणाऱ्याना मोकळे सोडले जाते. हा दहशतवाद नाही का ? दलित, आदिवासीना माओवादी ठरवून तुरूंगात डांबणे हा दहशतवाद नाही का ? घृणा, द्वेशाचे राजकारण करण्यातूनच दहशतवाद जन्म घेतो. स्त्री भ्रूणहत्या हा दहशतवाद नाही का ? असे सवालही त्यांनी केले. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा खरा चेहरा पुढे आणण्याची गरज आहे. दहशतवादाविरूध्दची ढोंगी लढाई हा देशद्रोह ठरेल.मजुरांना किमान वेतन मिळत नाही.स्वपक्षीयांना, न्यायमूर्तिंना मारल्याचे आरोप असलेले लोक सत्तेत , सत्ताधारी पक्षात असतील , तर दहशतवादाविरुध्द कशी लढली जाईल , याची शंका आमच्या मनात आहे.
मतदारांना जागृत करणे हा महत्वाचा उपक्रम आहे. काही पक्ष केवळ मतविभागणी साठी नि वडणूक लढवतात, त्यांच्यापासून सावध राहून प्रत्येक मत योग्य ठिकाणी जाईल याची खातरजमा केली पाहिजे, असेही अग्नीवेश यांनी सांगीतले.
लोकशाहीतील हिटलरचा अनुभव येतोय : श्रीपाल सबनीस
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून आजअखेर कोट्यवधी रुपयांचे कर्ज काहींनी बुडवले. शेतकर्यांच्या आत्महत्यांच्या घटनांवर हे सरकार काहीही ठोस करताना दिसत नाही. मात्र न्यायव्यवस्था, सीबीआय यांच्या कामामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारंवार हस्तक्षेप असतो. या माध्यमातून लोकशाहीतील हिटलरचा अनुभव येतो. अशा शब्दात साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. मागील ७० वर्षात ज्या पक्षांची सत्ता होती त्यांच्या कार्यकाळातही अशा घटना घडल्या. मात्र त्याहून सर्वाधिक घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात घडल्याचेही ते म्हणाले.
निरंजन टकले म्हणाले, ‘ तटस्थता बाळगून चालण्याची परिस्थिती नाही.आज स्पष्टपणे बोलणे अत्यंत जरुरी आहे. जवानांच्या हौतात्म्याचे राजकारण केले जात आहे. प्रचारसभेच्या शेजारच्या जिल्हात शहीदावर अंत्यसंस्कार असताना पंतप्रधान तेथे जात नाहीत, सर्व पक्षीय बैठकीला पंतप्रधान उपस्थित राहत नाहीत, याचे प्रश्न का उपस्थित केले जात नाहीत ? हे देशभक्त नाहीत, द्वेशभक्त आहेत. प्रत्येक आघाडीवर ते अपयशी ठरले आहेत.
सय्यद शुजाच्या पत्रकार परिषदेला सर्व राजकीय पक्षांना बोलाविण्यात आले होते.जे पक्ष आले नाहीत, त्या राजकीय पक्षांना प्रश्न विचारायचे की जे पक्ष उपस्थित होते,त्यांना विचारायचे ?
न्या.लोया हेही देशासाठी शहीद झाले आहेत,असेही टकले म्हणाले.
तिस्ता सेटलवाड म्हणाल्या, ‘ दहशतवादी हल्ल्यानंतर धार्मिक उन्माद निर्माण केला जात आहे. पत्रकारदेखिल यात मागे नाहीत.
‘ या सरकारने भयग्रस्त वातावरण निर्माण केले आहे. मजूर, शेतकरी, बेरोजगारीचे प्रश्न संपले नाहीत. मागील दहा वर्षात जे लोकशाहीवादी कायदे बनले, ते कमकुवत करण्याचे, रद्द करण्याचे काम या सरकारने केले आहे. भाजप सरकारविरुद्ध ‘ एकास एक ‘ उमेदवार उभे केले पाहिजेत.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले. ‘ घोषित आणीबाणी विरुद्ध लढल्यानंतर ४२ वर्षांनी अघोषित आणीबाणी विरुध्द लढण्याची वेळ आली आहे. इथली लोकशाही जिवंत राहावी, विचारवंत जिवंत राहावेत, विचार जागृत राहावेत यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यरत राहण्याची गरज आहे. हे मतदार जागृती ध्येय यशस्वी केले पाहिजे.
जांबुवंत मनोहर यांनी प्रास्ताविक केले. संदिप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
प्रारंभी काश्मीर हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली अर्पण करून आणि भारतीय घटनेच्या उद्देशिकेच्या प्रतिमेला अभिवादन करून ‘मतदार जागृती परिषद ‘ आयोजित जाहीर सभेला प्रारंभ झाला.