पंढरपूर – करिता देवार्चन, घरा आले संतजन…देव सारावे परते, संत पुजावे आरते…या संतवचनाप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज व जगद््गुरू संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालख्या दशमीच्या दिवशी संध्याकाळी तीर्थक्षेत्र पंढरीत दाखल झाल्या. विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि मध्य प्रदेशातून रेल्वे, एसटी आणि खासगी वाहनांमधून लाखोंच्या संख्येने वारकरी येथे दाखल झालेले आहेत.
यंदा सुमारे १५ लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज बांधून प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे. दरम्यान, ज्ञानेश्वर माउली व तुकोबारायांच्या पालख्यांचे गुरुवारी संध्याकाळी पंढरीनगरीत आगमन झाले. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सर्व पालख्यांचे विसावा येथील विठ्ठल मंदिराजवळ स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा
विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुरुवारी पंढरपुरात सपत्नीक आगमन झाले. शुक्रवारी पहाटे २.१० मिनिटांनी त्यांच्या हस्ते महापूजा होईल. मध्यरात्री १२.४५ वाजता पदस्पर्श दर्शन बंद केले जाईल. महापूजेनंतर ३.३० ते ४.१५ वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या वारकरी दांपत्याचा सत्कार व विविध दिंडीप्रमुखांना निर्मलवारी पुरस्कार प्रदान केला जाईल. मात्र, या कार्यक्रमाचा पदस्पर्श दर्शनाला कोणताही अडथळा होणार नाही, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी ढोले यांनी सांगितले.
चंद्रभागेतीरी लोटला अथांग जनसागर
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर चंद्रभागा नदीवरील स्नानाला विशेष महत्त्व असते. त्यामुळे चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकऱ्यांनी गर्दी केली आहे. गर्दीमुळे पुण्यनगरी पंढरीत वैष्णवांचा अथांग महासागर वाहत असल्याची अनुभूती येत आहे. सर्व प्रमुख रस्ते गर्दीने फुलून गेलेले आहेत.
दर्शनासाठी २० तासांचा कालावधी
विविध ठिकाणांहून विठ्ठलाच्या ओढीने आलेल्या भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे २० तासांहून अधिक कालावधी लागत आहे. मात्र, यंदा मंदिर प्रशासनाने चोख व्यवस्था केल्याने भाविकांचे दर्शन सुलभरीत्या होत आहे.