मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन मोठी घोषणा केली आहे. विविध विभागांमध्ये 1.5 लाख पदे भरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. महत्वाचे बाब म्हणजे यापूर्वी 72 हजार पदे भरण्याचे जाहीर करण्यात आले होते, ज्याची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. आता त्यात वाढ करुन हा आकडा 1.5 लाखांवर नेण्यात आल्याचे फडणविसांनी सांगितले.
लाखो मुले स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. पण जाहिरातच न आल्याने दरवर्षी अनेकांची निराशा होते, तर काही जणांचे वय पात्रतेपेक्षा अधिक होऊन जाते. त्यामुळेच अनेक वर्षांपासून सरकारी नोकरीकडे डोळे लावून बसलेल्या तरुणाईच्या अपेक्षा यापूर्वीच्या घोषणेमुळे जाग्या झाल्या होत्या. शिवाय ग्रामविकास विभागाकडूनही विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या नव्या घोषणेनुसार भरती प्रक्रिया सुरू झाल्यास लाखो तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होईल.
मुख्यमंत्र्यांनी ज्या 72 हजार पदांच्या भरतीची घोषणा केली होती, त्याची प्रक्रिया याआधीच सुरू झाली आहे, त्यामुळे नव्या घोषणेच्या अंमलबजावणीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांची क्षेत्रीय स्तरावरील 72 हजार पदे भरण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीचा आढावा राज्याच्या मुख्य सचिवांकडून घेण्यात येत होता.
मिळालेल्या माहितीनुसार विविध विभागांमध्ये 1 लाख 80 हजार पदे रिक्त आहेत. त्यापैकी 1.50 लाख पदे भरली जाणार असली तरी दरवर्षी तब्बल 50 हजार कर्मचारी निवृत्त होतात. त्यामुळे या रिक्त जागांचा ताण सध्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर येतो. राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे भरती केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईलाही दिलासा मिळणार आहे.