मुंबई : वारी आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव असून त्यांचे अनेक प्रश्न शासनाने सोडवले आहेत, उर्वरित प्रश्न सोडवू, अशी ग्वाही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
आज मंत्रालयात आयोजित वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध वारकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे असे सांगून श्री. देशमुख म्हणाले की, सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या प्रधानमंत्री महोदयांच्या तीन शब्दातच सर्व गोष्टी सामावल्या आहेत. प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला गॅस जोडणी योजनेतून महिलांची चुलीपासून आणि धुरापासून मुक्तता केली. याचा केवळ महिलांना लाभ झाला असे नाही तर यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोडही थांबली. वेळेची बचत होण्यास मदत झाली.
शासनाने प्रत्येक कुटुंबाचा आणि कुटुंबातील सदस्यांच्या हिताचा विचार केला.जनधन योजनेअंतर्गत गरिबांची बँक खाते उघडून त्यांना पत प्राप्त करून दिली. बँकेच्या मुख्य प्रवाहात आणल्यानंतर त्यांना मुद्रा योजनेतून उद्योग-व्यवसायासाठी कर्ज मिळू शकेल अशी व्यवस्था केली. आयुष्यमान भारत योजनेतून आरोग्यविषयक लाभ दिले. गरिबांसाठी परवडणाऱ्या घरांची योजना आणली. इतिहासात पहिल्यांदा शेतकऱ्यांना २४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, जगाचा पोशिंदा आहे त्याला सन्मान देणाऱ्या अनेक योजना या शासनाने राबविल्या. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा, त्याच्या शेतमाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न केला. या शासनाने शेतमालाला दीडपट हमीभाव दिला. हरभरा, तूर सारख्या पिकांसाठी भावांतर योजनेतून मोठी रक्कम शेतकऱ्यांना दिली तीही त्यांच्या थेट बँक खात्यात.
जलयुक्त शिवार योजनेमुळे ७० टक्के पाऊस होऊनही आपण कृषी उत्पादन वाढवू शकलो. मुख्यमंत्र्यांनी मिशन म्हणून या योजनेतून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्याचा प्रयत्न केला. वारकऱ्यानी आपल्या संत पंरपरेने घालून दिलेला वृक्षलागवडीचा संस्कार जनमाणसात रुजवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कीर्तन-प्रवचनातील शेवटची पाच मिनीटे वृक्षलागवडीसाठी द्या
विकास खारगे यांचे आवाहन
संत तुकारामांनी वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे म्हणत वृक्षांना आणि पशु-पक्षांना सगे सोयरे मानलं, वृक्षाचं मानवी जीवनातील महत्व सांगितलं. त्या संतपरंपरेची पताका खांद्यावर घेऊन वारीत जाणाऱ्या वारकऱ्यांनी, प्रवचनकारांनी, कीर्तनकारांनी त्यांच्या व्याख्यानातले,कीर्तनातले, प्रवचनातले शेवटचे पाच मिनिटे वृक्षलागवडीसाठी द्यावेत,त्यात त्यांनी वृक्षांचे मानवी जीवनातील महत्व समजून सांगून वृक्षलागवड आणि संगोपनासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी केले.
देवाचे दर्शन घेऊन जाताना जर प्रसादरूपी वृक्ष मिळाला तर त्याचे त्या वृक्षासोबत एक भावनिक नाते तयार होते, लावलेले ते रोप नक्की जगावे असा त्यांचा प्रयत्न असतो. हीच भावना लक्षात घेऊन महाराष्ट्रातील सर्व मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी प्रसादरुपाने भक्तगणांना रोप दिले जावे यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहे असे सांगून श्री. खारगे म्हणाले की, नदी पुनरुज्जीवनाचा कार्यक्रमही वृक्षलागवड उपक्रमांतर्गत हाती घेण्यात आला आहे. ईशा फाऊंडेशनच्या मदतीने नदीकाठी एक किमी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात येत आहे. विभाग वन शेतीला प्रोत्साहन देत आहे. फळझाड लागवडीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे त्याचबरोबर हरित महाराष्ट्राच्या निर्मितीला वेग मिळावा हा त्यामागचा हेतू आहे. इंद्रायणी नदी काठी ही वृक्षलागवड करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली. वृक्षलागवडीत स्थानिक प्रजातीची रोपे लावली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या राज्यात अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची कामे सुरु आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याची माहिती वृक्षलागवडीच्यावेळी घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
वारकऱ्यांनी देवराई निर्माणामध्ये पुढाकार घ्यावा असे आवाहन करतांना त्यांनी वन विभागामार्फत वृक्षलागवड, वन शेती, हॅलो फॉरेस्ट,हरित सेना या सर्व उपक्रमांची आणि योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
बैठकीत वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली मते आणि मागण्या मांडल्या. वारी ने अध्यात्माबरोबर सामाजिक विचारांची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच नशाबंदी, बेटी बचाव बेटी पढाव, स्वच्छता अभियान, हरित आणि निर्मल वारी सारखे विषय वारकऱ्यांच्या कीर्तन -प्रवचनाचा एक भाग झाले. वृक्षलागवड हा त्यातला एक महत्वाचा विषय नक्की आहे आणि राहील अशी ग्वाही वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली.
अनेक देवस्थानच्या स्वत:च्या जागा आहेत तिथे वृक्ष लागवड करण्यासाठी रोपे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणीही त्यांनी केली.