मुंबई :-
शेतकर्यांनी कृषिपंपांना ‘ऑटोस्विच’ लावल्यामुळें रोहित्रावरील भार वाढून ते जळण्याचे प्रमाण वाढत असून अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी शेतकर्यांनी ‘ऑटोस्विच’ चा वापर करून नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
राज्यात सुमारे 39 लाख कृषिपंपधारक शेतकरी आहेत. महावितरणकडून या शेतकर्यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा देण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी शेतकर्यांनी कृषिपंपांना ‘ऑटोस्विच’ लावले आहेत. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकर्यांनाही सोसावी लागते. हे टाळण्यासाठी शेतकर्यांनी कृषिपंपांना ‘ऑटोस्विच’ लावू नये तसेच इतर शेतकर्यांनी ते लावले असल्यास ते काढून टाकण्याची विनंती करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. यामुळे रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण कमी राहील व शेतकर्यांना योग्य दाबाचा, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळेल.
कृषिपंपधारक शेतकर्यांनी कृषिपंपाला ‘कपॅसिटर’ बसवावा, यामुळे वीजबचत होऊन पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळतो, कृषिपंप जळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच रोहित्रांवरील भार 30 टक्क्यांने कमी होऊन रोहित्र जळण्याचेही प्रमाणही कमी होते. या सर्वांचा लाभ शेतकर्यांना होणार असल्यामुळे त्यांनी ‘कपॅसिटर’ चा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही महावितरणने केले आहे.