पुणे-लोकपालच्या आंदोलनामुळेच मोदी सरकार सत्तेवर आलं. मात्र सत्तेवर येताच त्यांना लोकपालचा विसर पडला. त्यांनी देशाशी गद्दारी केली, अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मोदी सरकावर थेट तोफ डागली आहे. पाच वर्षांपूर्वी अरुण जेटली, सुषमा स्वराज लोकपालवर भरभरुन बोलत होते. मात्र आता ही सर्व मंडळी मूग गिळून गप्प आहेत, असे असं अण्णा हजारे म्हणाले. लोकपाल नियुक्तीच्या मागणीसाठी अण्णा हजारेंचं राळेगणसिद्धीत उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकपाल आंदोलनामुळे देश ढवळून निघाला. त्यामुळेच केंद्रात भाजपाची सत्ता आली. मात्र आज पाच वर्ष होऊनही त्यांना अद्याप लोकपाल नेमता आलेला नाही. ही देशाशी गद्दारी आहे, अशा तिखट शब्दांमध्ये अण्णा मोदी सरकारवर बरसले. दिलेला शब्द न पाळण्यात काँग्रेसची डॉक्टरेट, तर भाजपा ग्रॅज्युएट असल्याचंही त्यांनी म्हटलं. गेल्या पाच वर्षांपासून सरकारकडून जनतेची दिशाभूल सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्य सरकार साफ खोटं बोलत आहे, माझ्या नव्वद टक्के मागण्या मान्य झाल्या असत्या तर मी कशाला उपोषणाला बसलो असतो? असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे. कोणत्याही मागण्या मान्य झालेल्या नाहीत. या सरकारवर माझा विश्वास राहिलेला नाही. केंद्रातले मंत्री आणि मुख्यमंत्री मला भेटायला येणार असं मला कळवण्यात आलं. मी त्यांना कळवलं की तुम्ही येऊ नका कारण तुम्ही आलात की लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. तुम्ही ठोस निर्णय घ्या, मागण्या किती मान्य केल्या ते लेखी द्या त्यानंतर आम्ही विचार करू तुमच्यावर आता आमचा विश्वास नाही असंही अण्णांनी म्हटलं आहे.
उपोषण करू नका असं राज ठाकरेंनी सांगितलेली गोष्ट ऐकणार का? त्यावर अण्णा यांनी नाही म्हटलं आहे. परमेश्वर माझ्या पाठिशी आहे. मी आणखी पाच दिवस तरी उपोषण करू शकतो आणि मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी उपोषण करणारच असंही अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी भेट घेतली, माझ्या प्रकृतीची चिंता व्यक्त केली त्याचं बरं वाटलं मात्र मी माझं उपोषण मागण्या मान्य होईपर्यंत मागे घेणार नाही. लोकपाल, लोकायुक्तांच्या मागणीमुळे जे आंदोलन उभं राहिलं होतं त्यामुळे मोदी सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यावर आता मात्र लोकपाल आणि लोकायुक्त यांचा सोयीस्कर विसर मोदी सरकारला पडला. मोदी देश हुकूमशाहीकडे घेऊन जात आहेत असाही आरोप अण्णा हजारेंनी केला. मोदी सरकार आणि फडणवीस सरकार जनतेची दिशाभूल करत आहेत असाही आरोप पत्रकारांशी बोलताना केला.
2013 मध्ये भाजपाने तुमचा वापर केला असं राज ठाकरे म्हटले, त्याबद्दल काय सांगाल? असं विचारताच अण्णा म्हटले की राज ठाकरे म्हटले ते सत्य आहे सगळ्या देशालाच हे माहित आहे. त्यावेळी लोकपालच्या आंदोलनामुळे भाजपाची सत्ता आली मात्र आत्ता त्यांना माझा आणि आंदोलनाचा विसर पडला. भाजपा असो आप असो कोणीही लोकपाल, लोकायुक्त यांच्यावर शब्दही काढत नाहीत हे दुर्दैवी आहे असंही अण्णा हजारे म्हटले आहे. तसंच सत्ता बदलून परिवर्तन होणार नाही व्यवस्था बदलली पाहिजे असंही मत यावेळी अण्णा हजारेंनी व्यक्त केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम करणारे मुख्यमंत्री आहेत असं वाटलं होतं मात्र त्यांनी वारंवार शब्द देऊनही तो पाळला नाही त्यामुळे आता त्यांच्यावर माझा विश्वास राहिला नाही असंही अण्णा म्हटले आहेत.