पुणे : “जीवनात यशस्वितेचे शिखर गाठायचे असेल तर विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे मोठ्या प्रमाणात वळावे,”असा महत्वपूर्ण सल्ला कॅप्रिहंस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रॉबिन बॅनर्जी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ बिजनेसमधील पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम)च्या ३३ व्या बॅचच्या पदवी प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. वालचंद नगर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक जी.के. पिल्लई सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी २८३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
एमआयटीचे अधिष्ठाता प्रा.डॉ. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलसचिव डी.पी. आपटे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्रमुख सल्लागार डॉ. जय गोरे, एमआयटी स्कूल ऑफ बिजनेसचे डायरेक्टर डॉ. कल्याण स्वरूप व एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटच्या सहयोगी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास हे उपस्थित होते.
रॉबिन बॅनर्जी म्हणाले,“ दोन वर्षापूर्वी करण्यात आलेल्या जागतिक पाहणीचा निष्कर्ष असा होता कि, ज्यांनी उद्योजकतेच्या ध्येयाने कार्य केले त्यांची वेगाने प्रगती झाली. विद्यार्थ्यांनी सदैव भावनांक आणि बुद्धांक या दोन गोष्टींचे संतुलन ठेऊन कार्य करावे. सकारात्मक विचारधारा ठेवल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल.”
जी.के.पिल्लई म्हणाले,“ व्यवस्थापनाच्या विद्यर्थ्यांनी स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला शिकावे. विद्यार्थ्यांजवळ मोठ्या प्रमाणात ज्ञान असले तरी जो पर्यंत त्या ज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग केला जात नाही, तो पर्यंत त्याला काहीही अर्थ नसतो. स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन कार्य केल्यास तुमची व कंपनीचीही प्रगती होत असते. हे सूत्र लक्षात ठेवावे. कार्य करतांना तुम्ही जेथे आनंदी असाल, तेथेच तुमची प्रगती होईल.”
डॉ. जय गोरे म्हणाले,“ व्यवस्थापनेच्या विद्यार्थ्यांनी कधीही नुकसान व फायदा या गोष्टींवर लक्ष देऊ नये. नेहमी स्वतःच्या जबावदारीवर निर्णय घ्यावे. प्रत्येक क्षणा-क्षणातून शिकत असतांना कठोर परिश्रमातून आपले भविष्य घडवावे. व्यवसायात नेतृत्व करतांना निर्णय घेण्याबरोबरच दूरदृष्टीही ठेवावी. स्वतःची कारकीर्द घडविताना कधीही द्विधा अवस्थेत राहू नये.”
डी.पी. आपटे म्हणाले, तुम्ही कितीही यशस्वी झालात, तरी आई-वडील व शिक्षक यांना विसरू नका. तुम्ही बाहेरच्या जगात जे चांगले काम कराल, त्यामुळे संस्थेचे नाव मोठे होईल.”
यावेळी डॉ. कल्याण स्वरूप यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. त्यामध्ये ते म्हणाले, ३३व्या बॅच मधील २८३ पदवीधरांपैकी बहुसंख्य स्नातकांनी उच्च श्रेणी प्राप्त केली आहे. त्याच प्रमाणे ९० टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली असून काही विद्यार्थ्यांनी वडिलोपार्जित व्यवसायात प्रवेश केला आहे व काही मोजक्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.
सलोनी अग्रवाल आणि तनिष प्रकाश यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. चेतन चौधरी यांनी आभार मानले.