पुणे :मातंग समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका आणि आपली एकत्रित ताकद दाखविण्यास भाग पाडू नका असा स्पष्ट इशारा आज मातंग समाजाचे नेते रमेश बागवे यांनी येथे दिला .राज्यातील मातंग समाजाच्या अन्याय अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याच्या कारणावरून पुणे शहरात आज मातंग समाजाच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला. सारसबागेच्या जवळील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. संविधान उद्देशिका वाचनाने मोर्चाची सुरवात झाली . मूकपणे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव सहभागी झाले होते.कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे , अविनाश बागवे हे आपल्या संपूर्ण कुटुंबीया सह मोर्चात सहभागी झाले होते .तर रिपब्लिकन पक्षाचे आणि पुण्याचे उपमहापौर डॉ . सिद्धार्थ धेंडे ,राष्ट्रवादीचे सुभाष जगताप ,योगेश वऱ्हाडे ,भाजपचे नगरसेवक धीरज घाटे , शाम शिंदे ,तसेच कविता वैरागे ,भरत वैरागे, मालन साठे ,हिरामण बनकर, अभय छाजेड,लता राजगुरू ,मनीष आनंद ,सोनाली लांडगे ,सरस्वती शेंडगे असे विविध पक्षांचे आणि संघटनांचे असंख्य मान्यवर नेत्यांसह अराजकीय क्षेत्रातील बहुसंख्य पुरुष,महिला ,तरुण वर्ग या मोर्चात सहभागी झाला होता . विराट अशा या मोर्चाने रिमझिम होणाऱ्या पावसाची तमा बाळगली नाही ,मात्र जोशमय अशा या मातंग समाजाचा मोर्चाने शहरातील सर्व वाहतूक विस्कळीत झाली . हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला .
या मोर्चातही मराठा मोर्चाप्रमाणे महिला अग्रस्थानी होत्या. स्वारगेट ते जिल्हाधिकारी कार्यलयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चासाठी वाहतूक मार्गांमध्ये काही बदल करण्यात आले होते. मोर्चासमोर कोणताही अडथळा येऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुणे शहर आणि जिल्ह्यासह मातंग समाजातील विविध मान्यवर मोर्चात सहभागी झाले होते. प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्च्याची सांगता करण्यात आली.
यावेळी माध्यमांशी बोलताना रमेश बागवे यांनी म्हटले कि , गेल्या 4 वर्षात मातंग समाजावर अन्याय वाढतो आहे त्याची परिणीती म्हणून कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता काढलेल्या या मोर्चाने विराट स्वरूप धारण केले आहे . यामुळे सरकारने याची तातडीने दाखल घ्यावी आणि या समाजाला आपली एकत्रित ताकद दाखविण्याची वेळ येवू देवू नये . ऍट्रासिटी कायदा शिथिल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी आता तरी सावध व्हावे आणि या कायद्याची कडक अंमलबजावणी करावी . झोपडपट्टीमधील तरुणाई व्यसनी होते आहे यामुळे झोपडपट्टीतील देशी दारूची सर्व दुकाने तातडीने बंद करावीत .भीमा कोरेगाव प्रकरणातील साक्षीदार पूजा सकट च्या मारेकऱ्यांना कडक शासन झाले पाहिजे . मातंग समाजातील अबकड वर्गवारी नुसार आरक्षण अंमलबजावणी सुरु झाली पाहिजे . .पुण्यात लहूजी वस्तादांचे स्मारकाचे काम तातडीने सुरु केले पाहिजे . अशा विविध मागण्या आम्ही या मोर्चा द्वारे मांडल्या आहेत . त्या तातडीने सरकारने मान्य कराव्यात .