नागपूर – ”माऊली-तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ होता, असे बेताल वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले. हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी चुकीचे असून महाराष्ट्रातील जनता कदापी खपवून घेणार नाही. यामागील मास्टरमाईंड कोण आहे हे स्पष्ट करावे आणि तरुणांचे विचार भ्रष्ट करण्याचे काम करणाऱ्या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा”, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ‘माऊली आणि तुकोबाचे विचार सर्व जगाला माहिती आहे. आपण त्यांच्या विचारांसमोर नतमस्तक होतो. पण कोण तरी संभाजी भिडे येतो आणि माऊली-तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ होता असे बेताल वक्तव्य करतो हे योग्य नाही’, असंही अजित पवार म्हणालेत.
57 टक्के लोकांना शुद्र मानणारा मनू श्रेष्ठ कसा ? हे आपल्या राज्यात चालणार नाही. यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी. मागच्या वर्षी हे पालखीमध्ये तलवारी घेवून आले होते. यांचा पाठीराखा कोण आहे असा सवालही अजित पवार यांनी केला आहे. त्या व्यक्तीला काय बोलावं कसं बोलावं. एकीकडे सांगितले आंबे खा म्हणजे मुलं होतील…त्यांनी पिकवलेले आंबे… आणि काल तर कहरच केला. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरमाऊली महाराज यांच्यापेक्षा मनु हा श्रेष्ठ होता या पध्दतीचं वक्तव्य…म्हणजे मनुने काय सांगितले होते. मनुने सर्वांना अतिशय तुच्छ लेखलं होतं. समाजातील दोन-तीन टक्केच लोक चांगली आहेत असे विचार मनुने सांगितले. तो विचार योग्य नाही हे सांगण्याचे काम महात्मा फुलेंनी केलं. घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली आणि ती मनुस्मृती फाडून जाळून टाकली. त्या मनुला हे गोंजारत आहेत हे कसले विचार आणले जात आहेत असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
राधाकृष्ण विखेपाटील-
ज्ञानोबा-तुकोबांपेक्षा मनु एक पाऊल पुढे होता, या संभाजी भिडे यांच्या विधानाशी सरकार सहमत नसेल तर त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी आणि सहमत असेल तर सभागृहात ठराव मांडून मनुस्मृतीला भारतीय संविधानापेक्षा श्रेष्ठ जाहीर करावे, अशी उपरोधिक टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ज्ञानोबा-तुकोबांपेक्षा मनुला मोठे ठरवणाऱ्या संभाजी भिडेंवर आणि त्याअनुषंगाने सरकारवर सडकून टीका करताना विखे पाटील म्हणाले की, संभाजी भिडे सातत्याने कायद्याच्या चिंधड्या उडवत आहेत.
ही भूमिका सरकारला मान्य आहे का? समाजातील वाईट चालीरिती, रूढींवर प्रहार करणारी, समतेची शिकवण देणारी आपली थोर संत-परंपरा कुठे आणि विषमतेची बिजे रोवणारी व समाजाला प्रतिगामी बनवणारी मनुस्मृतीत कुठे? असे प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केले.
गेल्या वर्षीच्या वारीत त्यांनी नंग्या तलवारी नाचवल्या होत्या. परंतु, त्यांच्याविरूद्ध कारवाई झाली नाही.
भीमा-कोरेगावच्या हिंसाचारात त्यांची भूमिका संशयास्पद होती. परंतु, त्यांच्याविरूद्ध कारवाई झाली नाही. मनुस्मृतीचा उदो-उदो करणाऱ्या संभाजी भिडेंची सरकार सातत्याने पाठराखण करते; याचा अर्थ सरकार त्यांच्याशी सहमत आहे. संभाजी भिडेंवर आणि त्यांच्या भूमिकेवर सरकारला एवढेच प्रेम असेल, मनुस्मृतीचे श्रेष्ठत्व सरकारला मान्य असेल, तर मग अधिवेशन सुरू आहे, कायदा करा आणि मनूस्मृती भारताच्या संविधानापेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे जाहीर करून टाका, अशी खोचक टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –राज्य शासन ज्ञानोबा-तुकोबांच्या आणि राज्यघटनेच्या विचाराने चालणारे असून मनुवादाचे समर्थन करणारे नाही. शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे संविधानाच्या विरोधात बोलले असल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान सभेत सांगितले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व सदस्य अजित पवार यांनी या प्रश्नी उपस्थित केलेल्या मुद्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पालखी मिरवणुकीत दर्शनाला येताना व मिरवणुकीच्या स्वागतासाठी शस्त्र आणण्यास बंदी केली होती त्या ऐवजी डमी शस्त्र आणण्यास परवानगी होती. राज्य शासन कुठल्याही प्रवृत्तीला थारा देत नसून संविधानाच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
संभाजी भिडे यांचे ‘मनु’संदर्भातील वादग्रस्त विधान
”गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करुन हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला मनुने शिकवले. हा मनु संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता”, असे धक्कादायक विधान संभाजी भिडे यांनी केले होते. पालखी सोहळ्यादरम्यान आपल्या धारकऱ्यांना जंगली महाराज मंदिरात संबोधित करताना ते बोलत होते.
ज्यांचा हिंदुत्वावर विश्वास आहे.त्या सर्वांनी गावागावात सभा संमेलन घ्यावे. देशाला वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याची आवश्यकता आहे. ‘वैदिक हिंदू धर्म हा अनुभव सिद्ध असून मनाला जिंकून घेण्याची प्रक्रिया म्हणजे धर्माचार होय. धर्म हा आचरणातून बळकट होतो. त्याला अधिक बळकटी देण्यासाठी संघटनांची गरज असून सर्व हिंदू धर्मियांनी एकत्र यायला हवे,’ असे भिडे यावेळी म्हणाले तसेच बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय पण ते वढू रायगडाला मान्य नाही असेही ते यावेळी म्हणाले.