विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षाला दहा जागा सोडाव्यात -रामदास आठवले
निवडणूक कमळ नव्हे, तर स्वतःच्या चिन्हावर लढणार
पुणे : “लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकद लावली. युतीत मित्र पक्षांना १८ जागा सोडणार असल्याचे नेत्यांनी जाहीर केले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १० जागा सोडाव्यात,” अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. विधानसभा निवडणूक कमळ चिन्हावर नाही, तर आमच्या स्वतःच्या चिन्हावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे, राष्ट्रीय निमंत्रक अॅड. मंदार जोशी, सरचिटणीस महिपाल वाघमारे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे आदी उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, “केंद्रात दुसर्यांदा सामाजिक न्याय विभागाचा मंत्री झाल्यानंतर प्रथमच प्रशासकीय अधिकार्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. पंतप्रधान आवास योजना, मुद्रा योजना, एसआरए, आरोग्य योजना, शिष्यवृत्ती अशा सगळ्याच बाबतीत चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. झोपडपट्टीतील लोकांना पक्की घरे देण्यासाठी पुढील पाच वर्षांत भर दिला जाणार आहे. त्यासाठी गायरान जमीन ताब्यात घेऊन पंतप्रधान आवास योजनेत घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.”
“व्हीजेएनटीला स्वतंत्र आरक्षण देण्याचा विचार सुरू आहे. धनगर समाजाला न्याय देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. माझ्या मंत्रालयाचे बजेट ७६ हजार कोटीचे आहे. त्यामुळे भविष्यात अनेक मोठी कामे मार्गी लागणार आहेत. भीमा कोरेगाव स्मारकाला आणखी भव्य करण्याचा प्रस्ताव आहे,” असेही आठवले यांनी नमूद केले.
युतीबाबत बोलताना आठवले म्हणाले, “शिवसेना-भाजपने युती टिकवून ठेवली पाहिजे. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात तीन जागा व पुण्यात किमान एक जागा मिळाली पाहिजे. मुख्यमंत्री पदावरून सामंजस्याने घ्यावे. अडीच-अडीच वर्षावर चर्चा होत असल्यास युतीने भाजप सेनेला दोनदोन वर्षे व रिपब्लिकन पक्षाला एक वर्ष मुख्यमंत्री द्यावे.”