महेश बडे यांनी प्रास्ताविक केले. निलेश आरडळे, त्रिवेणी काहलकर, आरिप पटेल यांनी सूत्रसंचालन केले. माधव जगताप यांनी आभार मानले.
समाजातील कुरूपता संपविण्यासाठी काम करावे -इंद्रजीत देशमुख
पुणे : “दुसऱ्याचे जीवन समृद्ध करतानाच आपले जीवन समृद्ध होत असते. आज समाजात दारिद्र्य, निरक्षरता, भेदाभेद असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी केवळ अधिकारीच झाले पाहिजे असे नाही. आपल्या अस्तित्वाने समाजातील कुरूपता संपविण्यासाठी आपण काम केले पाहिजे. प्रशासनात आल्यावर भ्रष्टाचार करणार नाही आणि आठवड्यातील एक दिवस समाजासाठी काम करणार, हे सूत्र अवलंबले, तर चांगला माणूस होता येते,” असा सल्ला माजी अतिरिक्त मुख्य सचिव इंद्रजित देशमुख यांनी विद्यार्थ्यांना दिला.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वास्तव ,भवितव्य व दिशा दाखवण्यासाठी आयोजित स्पर्धा परीक्षा महोत्सवात मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते. यावेळी २०१९ च्या यूपीएससी परीक्षेतील यशवंत तृप्ती धोडमिसे, एमपीएससी यशवंत स्वाती दाभाडे, सृजन फाऊंडेशनचे संस्थापक व बारामती अॅग्रो फूड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार, एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे, किरण निंभोरे आदी उपस्थित होते.
तृप्ती दोडमिसे म्हणाल्या, “खासगी क्षेत्रात कार्यक्षमता अधिक असते. त्याचा फायदा तयारी करताना झाला. नोकरी सांभाळून तयारी केली. आपणही अशा रीतीने यश मिळवू शकाल. सेवेतील आव्हाने समजून त्यानुसार तयारी करावी. माहिती उपलब्ध आहे म्हणून सगळीकडे लक्ष देण्यापेक्षा आवश्यक तेवढेच वाचले पाहिजे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी मुलांचा टक्का वाढला पाहिजे. राज्य लोकसेवा आयोग इतर राज्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी करत आहे. लाखो मुलांमधून तुम्हाला पद मिळवायचे असेल, तर सोशल मीडियाचा वापर कमी केला पाहिजे. तंत्रज्ञानाचा अभ्यासात योग्य वापर केला पाहिजे. दोनतीन वर्षात थांबले पाहिजे. स्पर्धा परीक्षा हे ‘अरेंज मॅरेज’सारखे असून, यशासाठी तडजोडी कराव्या लागणार हे समजून घेतले पाहिजे.”
स्वाती दाभाडे म्हणाल्या, “स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना स्वयंअध्ययन अधिक महत्त्वाचे असते. प्रक्रिया समजून घेण्यासाठी क्लास, मार्गदर्शन उपयुक्त ठरते. सतत सकारात्मक राहून वेळेचे नियोजन करणे, अभ्यासातील मूलभूत संकल्पना समजून घेणे फायदेशीर ठरते. ट्रेंडपेक्षा आपला आतला आवाज ऐकायला हवा. प्लॅन बी तयार ठेवून वेळीच अन्य संधींबाबत विचार केला पाहिजे. या परीक्षांचा अभ्यास करताना अनेक आकर्षणे येतात. त्यापासून दूर राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. स्वतःशी आणि पालकांशी प्रामाणिक राहिले पाहिजे.”