पुणे – महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांच्या उपस्थितीत, अमळनेर येथील भाजपच्या प्रचारसभेत झालेल्या जोरदार हाणामारीमुळे, भाजपच्या राजकीय संस्कृतीचे खरेखुरे ‘उदात्त’ दर्शन घडले असून, साने गुरूंजींचे जन्मगाव असलेल्या अमळनेर सारख्या खानदेशातील शैक्षणिक माहेरघर मानल्या गेलेल्या सुसंस्कृत शहरात असा प्रकार घडावा, हे अतिशय क्लेशकारक असून, सर्वसामान्य लोकांना मान खाली घालावी लागत असल्याची सणसणीत टीका, ज्येष्ठ समाजवादी नेते आणि मतदार जागृती परिषदेचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केली. ते मतदार जागृती परिषदेच्या वतीने आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
वरील हाणामारीचा प्रकार येथील भाजपच्या आमदार श्रीमती स्मिता वाघ यांचे लोकसभेचे तिकीट ऐनवेळी कापून, ते श्री. उत्कर्ष पाटील यांना जाहीर झाल्यापासूनच पक्षामध्ये असंतोष धुमसत होता आणि शेवटी त्याची परिणती माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना प्रचारसभेसाठी उपस्थित असलेल्या लोकांसमोरच व्यासपीठावर लाथाबुक्क्यांनी मारण्यात आले, तसेच श्री. गिरीश महाजन यांनाही धक्काबुक्की करण्यात आली, हा प्रकार खरंतर कोणत्याही राजकीय पक्षाला शोभा देणारा नसून, भाजपच्या वाढणा-या सत्तेच्या लालसेपोटी ठिकठिकाणी घडत असल्याबद्दल डॉ. सप्तर्षी यांनी अशा हिंसकवृत्तीचा निषेध व्यक्त केला. मागील पाच वर्षात दिल्ली ते गल्लीत सुरू असलेल्या दंडेलशाहीतून सार्वजनिक जीवनात अरेरावी, मस्तवालपणा आणि हिंसा रुजविण्याचा भाजपने नेहमीच प्रयत्न केला असून, हीच प्रवृत्ती आता भाजप व संघ परिवारावर उलटत असून, लोकांनी महात्मा गांधी, साने गुरूजीं, या महनीय नेत्यांचे स्मरण करून महाराष्ट्रात मतदानातून अशा प्रवृत्तींना वेसण घालून परिवर्तन घडवावे असेही, आवाहन डॉ. सप्तर्षी यांनी शेवटी केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव श्री. अन्वर राजन, प्रशांत कोठडिया, जांबुवंत मनोहर, मयूरी शिंदे, आप्पा अनारसे, चित्रलेखा जेम्स, इस्माईल शेख, आदींनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
मतदार जागृती परिषदेचे सचिव श्री. संदीप बर्वे यांनी या मेळाव्याचे सूत्रसंचालन केले.