मुंबई : हरियाणा शासनातर्फे गुरुग्राम हरियाणा येथे झालेल्या ‘डिजिटल इनोव्हेशन अँड सायबर सिक्युरिटी’ विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ‘स्मार्ट पोलिसिंग एनिशिएटीव्ह’ या गटात महाराष्ट्र शासनाच्या ‘ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेटिफिकेशन सिस्टिम (ॲम्बिस) या प्रणालीस आणि महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पास व प्रशिक्षणातील उत्कृष्ट कार्याबद्दल दोन पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
गुडगाव (हरियाणा) येथे आज झालेल्या परिषदेत महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार महाराष्ट्र सायबर टीमने स्वीकारले. यावेळी झालेल्या परिसंवादात ‘नाविन्यपूर्ण संकल्पनेतून प्रशासन’ या विषयावर विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सिंह यांनी सहभाग घेत महाराष्ट्र सायबरच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. यावेळी आयोजित परिसंवादात ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग, डाटा सेंटर आणि नवीन तंत्रज्ञान’ या विषयावर श्री. ब्रिजेश सिंह यांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र शासनाने सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबरची स्थापना केली आहे. याद्वारे राज्यातील पोलीसांना सायबर गुन्हे रोखण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्याबरोबरच तांत्रिक सहाय्य केले जाते. गुन्हेगारांचा संपूर्ण डेटा एका ठिकाणी रहावा, गुन्हेगारांच्या ठशांची माहितीचे डिजिटल संकलन व्हावे, जेणेकरून गुन्ह्यांची उकल जलदगतीने होईल, यासाठी ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेटिफिकेशन सिस्टिम (ॲम्बिस) ही प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीद्वारे सुमारे साडेसहा लाख बोटांचे ठसे डिजिटल स्वरुपात साठविले आहेत. त्याचबरोबर तळहातांचे ठसे, डोळ्यांचे बुबुळ व चेहरा यांचे बायोमेट्रिक नोंद ठेवण्यात आली आहे. सीसीटीएनएस, सीसीटीव्ही आदी यंत्रणांबरोबर ही यंत्रणा जोडण्यात येणार आहे. पोलीस स्टेशन स्तरापर्यंत ‘ॲम्बिस’ प्रणाली राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या सर्व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन इनोव्हेशन अँड सायबर सिक्युरिटी विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ‘ॲम्बिस’ प्रणालीस व महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पास विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
महाराष्ट्र सायबर चमूतील पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे ,अविनाश सरवीर, सुरेश मुदगून कार्यालय अधीक्षक प्रविण शिखरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद जोशी, श्रीमती रुपाली गायकवाड, संदीप जाधव, पोलीस हवालदार जालिंदर जगताप, पोलीस शिपाई नवनाथ देवगुडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.