पुणे :- खेड शहरापासून सुमारे 15 किमी. अंतरावर वसले आहे ऐतिहासिक वाफगांव. पूर्णत: पावसाच्या पाण्यावर येथील ग्रामस्थ शेती करीत होते. वर्षामध्ये जेमतेम एकवेळा ज्वारीपीक, पावसाळयात घेता येत होते. मात्र जलयुकत् शिवार अभियानात येथे दोन के.टी.वेअर बंधारे बांधण्यात आले आणि त्यामुळे या परिसराचा कायापालटच झाला. जिल्हा प्रशासनाने लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियानात दोन के.टी.वेअर बंधारे बांधले. यामुळे गावामध्ये शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाला. शाश्वत पाणीसाठी उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांनी पारंपरिक पिकांबरोबरच नगदी पिके घेण्यास सुरुवात केली. भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाल्याने, विहीरीच्या पाणी पातळीत 1 ते 1.50 मी.पर्यत वाढ झाली. यामुळे आता गावाला बारमाही संरक्षित पाणी उपलब्ध झाले आहे. ठीबक सिंचनाचा वापर करुन आता टोमॅटो, फुलकोबी, मका, भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात झाली आहे. तसेच चारापिके घेतल्यामुळे जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्नही निकाली निघाला.
विविध नगदी पिके घेतल्यामुळे, ग्रामस्थांच्या उत्पन्नात वाढ झाली, त्यामुळे शासनाने अजून के.टी.वेअर बंधारे बांधवयास हवे, अशी प्रतिक्रिया येथील शेतकरी यशवंतराव बबनराव सुर्वे यांनी भेटीप्रसंगी दिली. त्यांचे स्वत:चे शेतीतील उत्पन्न गेल्या दोन वर्षात दुप्पट झाले असल्याची माहितीसुध्दा त्यांनी दिली. जलयुक्त शिवार अभियानातील कामांपूर्वी, गावामध्ये नोव्हेंबरनंतर पाण्याचा प्रश्न निर्माण होत असे. आता मात्र जवळपास वर्षभर पाणी उपलब्ध होते, अशी माहिती त्यांनी दिली. शेतीमधील उत्पादनाला मंचर, खेड व पुणे येथे मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळे, उत्पादित केलेल्या शेतमालाच्या विक्रीचाही प्रश्न सुटला असल्याचे त्यांनी आनंदाने सांगितले.
“गावात पाणी वाढले, त्यामुळ शेतीचे उत्पन्न वाढले व त्यामुळे जीवन वाढले”,अशी भावना शेतकरी जयेश वसंतराव जवळेकर यांनी व्यक्त केली. गावात भरपूर पाणी उपलब्ध झाल्यामुळे, ग्रामस्थांचे स्थलांतर कमी झाले. सुमारे 4000 लोकवस्तीच्या गावाला पिण्यासाठी, शेतीसाठी व जनावरासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे टँकर बंद झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पावसाळयातील पाण्यावर पूर्वी फक्त ज्वारी पिक घेत होतो, पाण्याच्या उपलब्धतेमुळेआता मका, कांदा, बटाटा अशी कमी पाण्यात येणारी नगरी पिके घेत असल्याचे, ग्रामस्थ गणेश हनमंत थीटे यांनी सांगितले. त्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे घरामध्ये आनंदी वातावरण असल्याचे म्हणाले.
अरुण सिताराम क्षिरसागर यांनी जलयुक्त शिवार अभियानातील कामामुळे त्यांच्या विहीरीला पाणी वाढल्याचे सांगितले. यामुळे मका व भाजीपाला पिकांसह जनावरांसाठी चारा उपलब्ध झाल्याची माहिती दिली.
रमेश मनोहर कऱ्हाळे यांनी शेततळयातील गाळ जलयुक्त शिवार अभियानामधील कामामध्ये काढल्यामुळे, पाणी साठवण क्षमता वाढून, दोन हंगामामध्ये विविध पिके घेता येणे शक्य झाल्याची भावना व्यक्त केली. या शेततळयामुळे वारुडे, वाफगांव, गुळाणी व पारगांव या गावामधील ग्रामस्थांना ड्रीपद्वारे पिकांना पाणी उपलब्ध झाले आहे. त्यांनासुध्दा विविध नगदी पिके घेणे शक्य झाल्याची माहिती दिली. या कामामध्ये समस्त गांवकरी, युवक, महिला वर्ग व विद्यार्थी यांचा सहभाग लाभल्यामुळे जलयुक्त शिवार अभियान यशस्वी झाल्याचे दिसून येते.
शासनाची मदत व लोकसहभाग यामुळे परिसराचा कायापालट होतो, याचे वाफगांव उत्तम उदाहरण आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचे अनुकरण करण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले.