नवी दिल्ली – मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षांत पेट्रोल-डिझेलवर कर लावून ११ लाख कोटी रुपये कमावले आहेत. सामान्य लोकांच्या खिशावर डल्ला मारून वसूल केलेले हे पैसे कुणाच्या खिशात गेलेतअसा सवाल करत पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबर (सोमवार) रोजी भारत बंदची हाक दिली असून या बंदमध्ये विरोधी पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे.
पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅसच्या भरमसाठ दरवाढीमुळे देशातील सामान्य जनता मेटाकुटीला आली असून जनतेचा आक्रोश व्यक्त करण्यासाठीच काँग्रेसकडून या बंदची हाक देण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भारत बंददरम्यान सामान्य नागरिकांची कोंडी होऊ नये म्हणून दिवसभर बंद न पाळता सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद पाळला जाणार आहे, असेही सुरजेवाला यांनी स्पष्ट केले.
देशात आज कुणीही आनंदी नाही. महागाईने सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांनी जनता त्रस्त आहे. दुसरीकडे देशात हिंसाचारही वाढत चालला आहे. त्यामुळेच सरकारला जागे करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे, असे यावेळी गेहलोत म्हणाले.
अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे तसेच पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी बंदबाबत अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली असून बहुतेक पक्षांनी बंदला पाठिंबा दिला आहे. तृणमूल काँग्रेसने समर्थन दिले आहे मात्र ते बंदमध्ये सहभागी होणार नाहीत. बहुजन समाज पक्षाशी अद्याप बोलणे झालेले नाही, असेही सुरजेवाला यांनी यावेळी नमूद केले