नवी दिल्ली -राज्यात भंडारा-गोंदिया आणि पालघर पोटनिवडणुकांसह आगामी विधानसभा-लोकसभेच्या निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढवणार आहे. दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
पटेल म्हणाले, नाना पटोले हे माझ्या लहान भावासारखे आहेत. त्यामुळे आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, येत्या काळात आम्ही सोबत काम करु. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल. याबाबत येत्या ९ मे रोजी उमेदवाराची घोषणा करण्यात येईल. पक्षश्रेष्ठींनी यापुढील काळात भाजपा-सेनेविरोधात मोर्चे काढण्याच्या सूचनाही दिल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर नाना पटोले यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रफुल्ल पटेल आणि माझ्यातील वाद आता संपला आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपमुक्त करायचा यावर आमचे एकमत झाले आहे. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन लढवतील, याबाबत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील हा निर्णय आम्हाला दोघांनाही मान्य असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या कार्यपद्धतीवर टीका करीत भाजपामधून बाहेर पडलेले माजी खासदार नाना पटोले यांनी गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाच्या खासदारकीचा १२ डिसेंबर २०१७ रोजी राजीनामा दिला होता. तर १४ डिसेंबर २०१७ रोजी त्यांचा राजीनामा भाजपाने मंजूर केला होता. त्यामुळे पालघरसह या मतदारसंघात २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे.आता नाना पटोले भाजपाला रामराम करीत पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे आता या जागेवरील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दावा केल्याची चर्चा आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी हा मतदारसंघ आमचा असून आम्हीच ही जागा लढवणार त्याला पर्याय नाही अशी भुमिका घेतली आहे. त्यामुळे या जागेवर आता काँग्रेस-राष्ट्रवादीपैकी कुठल्या पक्षाच्या उमेदवाराली येथून संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठऱणार आहे.