मुंबई – राज्यात आलेल्या पूरपरिस्थित राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या मदत प्रक्रियेवर सोशल मीडियावर संताप उमटत आहे. मंत्री गिरीश महाजन यांचा पूरग्रस्त परिसरातील व्हिडिओ असो वा मदतीसाठी सरकारने काढलेला जीआर या सर्वांनाच ट्रोल केले जात आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सरकारी मदतीच्या पाकिटांचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामध्ये सरकारकडून पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या गहू आणि तांदळाच्या पाकिटांवर पुढाऱ्यांचे फोटो आहेत. हे फोटो फेसबूक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर संतप्त प्रतिक्रियांसह शेअर केले जात आहेत. त्यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
शासकीय मदतीवर नेत्यांचे फोटो लावू नका -मुख्यमंत्री
व्हायरल होणाऱ्या फोटोंवर शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. मुख्यमंत्री म्हणाले, पूरग्रस्तांना सरकारकडून अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. त्या पाकिटांवर मुख्यमंत्री, मंत्री आणि राजकीय नेत्यांसह पक्षांची छायाचित्रे चिटकवली जात आहेत. ही मदत म्हणजे एक सरकारी काम आहे. त्यावरून कुठल्याही व्यक्तीने असे करणे अपेक्षित नाही. या मदतीवर कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा व्यक्तीचा फोटो लावू नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केले आहे.