औरंगाबाद- सरकारच्या मालकिची जमीन हडपल्याप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम देण्यात आली होती. ही जमीन मुंडेंनी आपल्या पदाचा गैरवापर करुन त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली आणि ही कृषी जमीन अकृषिक केली. असा आरोप याचिकाकर्ते आणि रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी केला होता, त्यावर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. यावेळी औरंगाबाद खंडपीठाने मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच, तपासी अंमलदार अन्वर यांच्यावर औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले.
मी सुप्रीम कोर्टात दाद मागणार- धनंजय मुंडे
रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण काढल्याने राजाभाऊ फड यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. यातले याचिकाकर्ते राजा फड हे रत्नाकर गुट्टे यांचे जावई आहेत. अशी माहिती धनंजय मुंडे यांनी नमूद केली.दरम्यान, पावसाळी अधिवेशनाला अवघे काही दिवस बाकी असताना, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यावरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिल्याने, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.