मुंबई-नथुराम गोडसेला मानणारे लोक माझी हत्या करु शकतात असे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. अफवा पसरवण्यासाठी पाकिस्तानला मदत करत आहात या आरोपावर उत्तर देताना ओवेसींनी हे विधान केले. एक दिवस कोणी तरी मला गोळी मारेल असे वाटते. गोडसेच्या विचारसरणीला मानणारे लोक माझ्याबरोबर असे करु शकतात. आपल्या देशात आजही गोडसेला मानणारे लोक आहेत असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढण्याच्या सरकारच्या निर्णयावरुन त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. उद्या तुमच्यासोबतही हे घडू शकते असे त्यांनी इशान्य भारतातील लोकांना सांगितले. मी खासदार आहे पण मी अरुणाचल प्रदेश आणि लक्षद्वीपला जाऊ शकतो का? त्यासाठी मला परवाना घ्यावा लागतो. उद्या नागालँड, मिझोराम, मणीपूर, आसाम आणि हिमाचल प्रदेश या राज्यांच्याबाबतीतही असे घडू शकते असे ओवेसी म्हणाले.
कलम ३७० रद्द करण्यावर काय म्हणाले ओवेसी
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला एक अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना कृष्ण आणि अर्जुन असे म्हटला होता. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर त्याने ही स्तुतीसुमनं उधळली होती. असं असेल तर सद्यस्थितीत कौरव कोण आणि पांडव कोण? असा प्रश्न उपस्थित करत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अनुच्छेद ३७० वरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
एवढंच नाही तर मोदी सरकारचं काश्मीरवर प्रेम आहे पण तिथल्या नागरिकांवर नाही, त्यांना फक्त तिथले भूखंड प्रिय आहेत. त्याचमुळे काश्मीरच्या जनतेचं हित लक्षात न घेता निर्णय घेतले जातात असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. या सरकारला देशात महाभारत घडवायचं आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मोदी सरकारचं काश्मीरवर प्रेम आहे, तिथल्य काश्मिरींवर नाही. या सरकारला तिथले भूखंड, जमिनी प्रिय आहेत, तिथे कोण वास्तव्य करतं याच्याशी घेणं देणं नाही. यांना सत्ता प्रिय आहे मात्र न्याय नाही अशी टीका ओवेसी यांनी त्यांच्या भाषणात केली.
पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी असदुद्दीन ओवेसींची १० लाखांची मदत
एमआयएम अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी पुढाकार घेतला असून १० लाखांची मदत जाहीर केली आहे. यासोबत त्यांनी केरळसाठीदेखील १० लाखांची मदत करणार असल्याचं सांगितलं आहे. ही रक्कम थेट मुख्यमंत्री मदतनिधीत जमा होणार आहे. महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापुरात पुराने थैमान घातले होते. पुराचं पाणी ओसरलं असलं तरी पुन्हा नव्याने उभं राहण्याचं आव्हान पूरग्रस्तांसमोर आहे.
केरळमध्येही पुराने थैमान घातलं असून आतापर्यंत जवळपास ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ जिल्ह्यांमधील ५९ जण बेपत्ता आहेत. महाराष्ट्रातील मृतांचा आकडा रविवारी ४३ वर पोहोचला आहे. पुरामुळे प्रभावित झालेल्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्यांतील स्थिती पूर्वपदावर येत असून ओदिशा, केरळमध्ये मात्र अजूनही पावसाने थैमान घातलेले आहे. केरळमधील तीन राज्यांत दक्षतेचा इशारा देण्यात आला असून केरळमध्ये पूरबळींची संख्या ९१ झाली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने केरळमधील एर्नाकुलम, इडुकी आणि अलाप्पुझा या तीन जिल्ह्य़ांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून तेथे ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. थिरुअननंतपूरमचे हवामान विभाग संचालक के. संतोष यांनी ही माहिती दिली. केरळमधील उत्तरेकडील जिल्ह्य़ांमधील पूरस्थिती मात्र निवळत असून दैनंदिन जीवन पूर्वपदावर येत आहे. राज्यात अद्याप ५९ जण बेपत्ता आहेत.