मुंबई (प्रतिनिधी) : पर्यटनासाठी परिपूर्ण असलेला रत्नागिरी जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित करण्याची मागणी कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) प्रमोद जठार यांनी आज राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत आपल्या भाषणात रत्नागिरी जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ घोषित करण्याचे सूतोवाच केले होते हा संदर्भ प्रमोद जठार यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना पाठविलेल्या पत्रात देऊन रत्नागिरी जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून जाहीर करण्याचे आवाहन केले आहे.
रत्नागिरी जिल्हा हा पर्यटनासाठी अत्यंत योग्य आणि जिल्ह्याच्या विकासासाठी तर अधिक योग्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर रत्नागिरी जिल्ह्यालाही पर्यटनाचा दर्जा मिळाला तर कोकणात पर्यटकांची संख्या वाढण्यास मोठा हातभार लागणार आहे. शिवाय कळीचा मुद्दा असलेला बेरोजगाराचा प्रश्नही निकालात निघेल, असे श्री.जठार यांनी सांगितले.
पर्यटनासाठी समृद्ध असलेला रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे, वेळणेश्वर, गुहागर, हर्णे, जयगड यासारखे अतिशय सुंदर समुद्रकिनारे आहेत.पावस, मार्लेश्वर, राजापूरची गंगा, परशुराम देवस्थान यासारखी अनेक धार्मिक स्थळे आहेत. जयगड, मंडणगड, गोपाळगड, भगवतीगड, यशवंत गड किल्ले आहेत. रत्नागिरी जिल्हा ही नररत्नांची भूमी म्हणून ओळखली जाते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू गोपाळकृष्ण गोखले, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बी.जी. खेर, बाळासाहेब सावंत यांची ही जन्मभूमी रत्नागिरी जिल्हा ही जन्मभूमी तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही कर्मभूमी आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठासह ब्रह्मदेशाचे राजा थिबा पॅलेस व माचाळ राजापूर हे थंड हवेचे ठिकाणही रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
कोकण रेल्वे, मुंबई-गोवा नॅशनल हाय वे आणि पश्चिम महाराष्ट्रातून जोडलेल्या रस्त्यांमुळे पर्यटकांसाठी दळणवळणाची अनेक साधने रत्नगिरी जिल्ह्यात उपलब्ध झाली आहेत. नजीकच्या काळात रत्नागिरी येथील विमानतळ उडान योजनेंतर्गत सुरू होणार असल्याने देशी, विदेशी पर्यटकांना या जिल्ह्यातील अनेक स्थळे पाहण्यास मिळणार आहे.
आंबा म्हटले की रत्नागिरीचा हापूस आंबा जग प्रसिद्ध असल्याने हा हापूस मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात येतो. राजापूर बंदर हे ब्रिटिशांची वखार म्हणून प्रसिध्द आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गावागावात पुरातन काळातील कातळ शिल्पे आढळतात.