पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मावळ तालुक्याचे अध्यक्ष बंटी वाळूंज यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. ग्रामपंचायत निवडणुकांच्या वादातून हा आज (मंगळवार) हल्ला करण्यात आला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कामशेतजवळ ही घटना घडली. अज्ञातांनी केलेल्या या गोळीबारात वाळूंज यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर तळेगाव दाभाडे येथील पायोनीअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांना नेण्यात आले होते. तेथे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मावळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने निवडणुकीच्या वादातूनच हा गोळीबार झाल्याचा अंदाज आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून या हल्ल्याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात आरोप करण्यात येत आहेत.प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मावळ तालुक्याचे अध्यक्ष बंटी वाळुंज याच्यावर कामशेत येथील महाराष्ट्र बँकेसमोर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. यात वाळुंज यांच्या पोटाच्या उजव्या भागात गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी वाळुंज यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.. मावळमध्ये आज ग्रामपंचायत निवडणुकीची धामधुम आहे. या घटनेमुळे मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. मनसेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले आहेत. वाळुंज यांच्या मारेक-यांना पकडेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळे या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.कामशेत व वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पदाधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाळुंज यांच्यावरील गोळीबारामागे ग्रामपंचायत निवडणुकीचा काही संदर्भ आहे का या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे.