भाजपच्या राज्यात भांडवलदारांची चलती ;कामगारांचे बुरे दिन -अण्णा हजारे यांचा एल्गार होणार सुरु ? कामगार देणार साथ ?
पुणे – “अच्छे दिना”चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपच्या राज्यात मोजक्या भांडवलदारांनाचीच चलती सुरू आहे. शेतकरी आणि कामगार यांचे “बुरे दिन” सुरू झाले आहेत. धार्मिक वक्तव्य करण्याचे प्रमाण वाढल्याने सामाजिक वातावरणही बदलत आहे. त्यामुळे भाजप सरकारविरुद्ध पुन्हा एकदा व्यापक आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नवी टीम तयार करण्यात येत आहे, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगवर दिली आहे.
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हजारे यांनी खूप दिवसांनंतर शुक्रवारी (दि. ३०)आपला ब्लॉग अपडेट केला आहे.
त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, “महात्मा गांधी यांना आणखी आयुष्य लाभले असते तर ग्रामस्वराज्याचे आपले स्वप्न पूर्ण झाले असते. मधल्या आजारपणामुळे आपण लोकांशी संपर्कात राहू शकलो नाही. आता प्रकृती पूर्ववत झाली असून देशाच्या सेवेसाठी आपण पुन्हा तयार झालो आहोत. अरुण जेटली, सुषमा स्वराज यांनी लोकपालला पाठिंबा देत आपली प्रशंसा केली होती. लोकसभा निवडणुकीत हाच मुद्दा घेऊन भाजपने लोकांकडून मते मिळविली. मात्र सत्तेवर आलेल्या सरकारने “यू टर्न” घेतला आहे. याची आठवण करून देण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन पत्रे लिहिली. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
देशातील मोजके भांडवलदार सोडले तर इतरांचे वाईटच दिवस येत आहेत. भूसंपादन कायद्यात केलल्या बदलांमुळे शेतकरी पिचला जाणार असून कामगार कायद्यातील बदल श्रमजीवींसाठी धोकादायक आहेत. कायदे करताना लोकशाही मार्गाने न करता हुकूमशाही पद्धतीने अध्यादेश आणले जात आहेत. यावर खुद्द राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त करावी, हे दुर्दैव आहे. शेतकरी आणि श्रमिकांचे होणारे हाल आणि वाढता भ्रष्टाचार पाहवत नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा विचार आपण केला आहे. त्यासाठी नवी टीम तयार करण्यात येत आहे. ज्यांना यामध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी राळेगणसिद्धी येथील कार्यालयात संपर्क साधावा. राळेगणसिद्धी येथे अद्ययावत व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधा उभारण्यात येत असून तेथून आपण देशभरातील लोकांशी संपर्क राहणार असल्याचेही हजारे यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.”