नवी दिल्ली – पुलवामातील भारतीय सैनिकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा गुप्तचर यंत्रणेचे सर्वांत मोठे अपयश आहे. रुपया हे आशियातील सर्वात घसरते चलन ठरले आहे. मोदींचा पाच वर्षांचा कार्यकाळ हा देशातील शेतकरी, तरुण, व्यापारी आणि प्रत्येक स्वायत्त संस्थेसाठी त्रासदायक आणि विनाशकारी होता, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्तेतून हकालपट्टी करण्याची वेळ आली आहे.अशी जहरी टीका माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केली आहे. केंद्रातील एनडीए च्या धोरणांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर मनमोहनसिंग यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं.
देशात मोदी लाट ओसरली आहे. या सरकाराला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी नागरिकांनी तयारी केली आहे. या सरकारचा विकासावर विश्वास नाही. सत्तेतून बाहेर जाण्याची वेळ आल्याने ते असहाय्य झाले आहेत. नोटबंदी हा स्वातंत्र्यानंतरचा देशातील सर्वांत मोठा घोटाळा आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. कल्पना करू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली आहे, असा गंभीर आरोप मनमोहनसिंग यांनी केला.
पाकिस्तानसंदर्भात मोदींचे परराष्ट्र धोरण अतिशय निष्काळजीपणाचे होते. या सरकारने पाकच्या धोरणांवर अनेक कोलांटउड्या खाल्ल्या. पाकिस्तानला अचानक दिलेली भेट. त्यानंतर पठाणकोट विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी आयएसआयला दिलेले निमंत्रण. हा सर्व प्रकार संतापजनक आहे, असं मनमोहनसिंग म्हणाले.मोदी यांनीच भारतीय अर्थव्यवस्थेला खाईत लोटले आहे. थेट परदेशी गुंतवणुकीने गेल्या पाच वर्षांतील नीचांक गाठला आहे. रुपया हे आशियातील सर्वात घसरते चलन ठरले आहे. मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या वाटेवर आहे. सततच्या बदलत्या आर्थिक धोरणांना जनता कंटाळली आहे. जनतेत प्रचंड नाराजी आहे. पण याला तोंड देण्यासाठी भाजपने निवडणुकीत दहशतवाद आणि राष्ट्रवादाचा मुद्दा मोठा केला आहे. मात्र, पुलवामातील दहशतवादी हल्ला हा गुप्तचर यंत्रणेचे सर्वांत मोठे अपयश आहे. दहशतवादाविरोधात सरकारची तयारी अपू्र्ण आहे. हे यावरून स्पष्ट होतं. या सरकारच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली आहे. दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत, असा आरोप मनमोहनसिंग यांनी केला.