मुंबई-ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ते ८४ वर्षांचे होते. पहाटे सहा वाजता त्यांनी मुंबईतील कांजूरमार्ग येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी दोन वाजता मुंबईतील सायन स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे. मराठी भावसंगीताचा शुक्रतारा निखळल्याची भावना त्यांच्या निधनानंतर व्यक्त होत आहे.
अरुण दाते यांचे वडील रामूभैय्या दाते इंदूरमधील प्रतिष्ठित गायक होते. वडिलांच्या इच्छेनुसार अरुण दाते यांनी गायन क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर १९५५ पासून आकाशवाणीवर गायला सुरुवात केली. वयाच्या पन्नाशीत त्यांनी भावगीतांवर लक्ष केंद्रित केलं. १९६२मध्ये अरुण दाते यांच्या शुक्रतारा मंदवारा या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. ‘शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी’…’येशील येशील येशील, राणी पहाटे पहाटे येशील’…’भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’….’दिवस तुझे हे फुलायचे’…’अखेरचे येतील माझ्या शब्द तेच कानी’…आणि ‘या जगण्यावर या मरण्यावर शतदा प्रेम करावे’…अशा हळुवार आणि सुरेल गीतांनी भावगीतांना नवा आयाम देत त्यांनी दोन पिढ्यांवर अधिराज्य केलं.