नवी दिल्ली -भारतीय हवाई दलाने मंगळवारी भल्या पहाटे पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. पहाटे 3.30 वाजता झालेल्या या कारवाईला हवाई दलाने अधिकृत दुजोरा दिला आहे. पत्रकार परिषदेत संवाद साधताना हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानला दहशतवाद्यांच्या या ठिकाणांची माहिती देण्यात आली होती. परंतु, त्यांनी कारवाईस नकार दिला. त्यानंतरच भारताने तीन ठिकाणी फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले. हे कॅम्प जैश ए-मोहम्मदचा कमांडर मौलाना युसूफ अझर चालवत होता. तो जैशचा म्होरक्या मसूद अझरचा नातेवाइक होता. तो देखील या हवाई हल्ल्यात ठार झाला आहे. यासोबत, इतर शेकडो दहशतवाद्यांचा देखील खात्मा झाला.
नागरिकांना त्रास होऊ दिला नाही -हवाई दल
भारतीय हवाई दलाने पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला वारंवार दहशतवादावर कारवाईचे आवाहन केले. तरीही पाकिस्तानने त्यावर दुर्लक्ष केले. याच दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या वाहनावर हल्ला केला. पुलवामा येथे झालेल्या या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. अशात दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक होते. ही कारवाई फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर करण्यात आली आहे. यात कुठल्याही स्वरुपाने नागरिकांना त्रास देण्यात आला नाही. सोबतच, पाकव्याप्त काश्मीरात ही कारवाई झाली नाही. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीचे भारताने उल्लंघन केले नाही असे हवाई दलाने स्पष्ट केले.