पुणे : “”दार उघड बये दार; या महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्या चारही पक्षांना खड्ड्यात घाल. एकदा राज ठाकरेला सत्ता दे. मी एक विश्वास घेऊन आणि महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा घेऊन आलो आहे,‘‘ अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदारांना आवाहन केले.
पुणे शहर व जिल्ह्यातील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ठाकरे बोलत होते. या वेळी कसब्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर, शिवाजीनगरचे राजू पवार, पर्वतीचे जयराज लांडगे, पुणे कॅंटोन्मेंटचे अजय तायडे, खडकवासल्याचे राजाभाऊ लायगुडे, कोथरूडचे किशोर शिंदे, वडगाव शेरीचे नारायण गलांडे, हडपसरचे नाना भानगिरे यांच्यासह जिल्ह्यातील उमेदवार उपस्थित होते. राज यांनी दोन्ही कॉंग्रेस आणि भाजपवर सडकून टीका केली. मात्र, साबरमती नदी विकास प्रकल्पावरून त्यांनी आज गुजरातची स्तुती केली; तर शिवसेनेवर थेट टीका करणे टाळले.
ते म्हणाले, “”विरोधकांच्या ऍडजेस्टमेंटमुळे गेली पंधरा वर्षे महाराष्ट्रात आघाडीचे सरकार सत्तेवर राहिले. आपल्या फायलींवर मंत्र्यांकडून सही करून घ्यायची आणि महाराष्ट्राला खड्ड्यात घालायचे, हे उद्योग सुरू आहेत. सर्व एकाच माळेचे मणी आहेत. या चारही पक्षांनी महाराष्ट्राचा विचका केला आहे. कोणतीही नीतिमत्ता राहिलेली नाही. तरीदेखील आम्हालाच बहुमत द्या, असे ते सांगत आहेत.‘‘
भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले, “”युती तोडायची हे आधीपासूनच भाजपने ठरविले होते. लोकसभा निवडणुकीपासून भाजप आणि राष्ट्रवादीचे मनोमिलन सुरू होते. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका नेत्यामुळे हे मनोमिलन होऊ शकले नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून भाजपला साठ उमेदवार आयात करावे लागले. जे काल भ्रष्टाचारी होते, त्यांनाच प्रवेश देऊन उमेदवारी दिली. त्यामुळे पंतप्रधान मोदी भाजपच्या प्रचाराला येतात की या दोन्ही कॉंग्रेसच्या, असा प्रश्न पडतो. हे सर्व जण तुम्हाला मूर्ख बनवत आहेत. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांची कुवत काय आहे, हे मोदी यांनी पहिल्या भाषणात दाखवून दिले आहे. ते सगळे मिंधे आहेत. दोन्ही कॉंग्रेस नालायक आहेत.‘‘