मुंबई- राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांचे वक्तव्य अत्यंत निदंणीय आहे. आबांचे वक्तव्य चुकीचेच असून पक्षाच्या धोरणाशी विसंगत आहे भावनेच्या भरात वक्तव्य केल्याची पाटील यांची कबुली दिली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफीही मागितली, त्यामुळे विषय वाढवू नये, असेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
तसेच राज्यातील मतदार गोंधळलेला नसून तो अधिक सजग झाला आहे, त्यामुळे मतदार राज्याच्या हिताचा निर्णय घेतील, याची खात्री असल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी वार्तालाप केला.
पवार म्हणाले, यंदा स्वतंत्र लढत असल्याचे ही महत्त्वाची निवडणूक आहे. आतापर्यंत 60 गुणांचे काम केले असून 40 गुण मतदारांच्या हातात असल्याचेही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. आबांनी आपल्याच तासगाव मतदारसंघातील मनसेच्या उमेदवार सुधाकर खाडेने ‘निवडणूक होईपर्यंत तरी बलात्कार करायला नको होता’ असे म्हणत खळबळ माजवून दिली आहे.