एनआयपीएम व एआयएसएसएमएस च्यावतीने आयोजित परिसंवाद संपन्न
पुणे : स्वयंस्फूर्तीने काम केल्यानेच कर्मचाऱ्यांमध्ये गुणवत्ता विकसित होते आणि अशी स्वयंस्फूर्ती असण्यासाठी मुळात तो कर्मचारी त्याच्या कामाप्रती त्वत्वनिष्ठ व प्रामाणिक असणे आवश्यक असते तसेच संस्थात्मक मूल्ये यांचेही महत्व आहे, असे मत टाटा ग्रुपच्या मुंबईच्या ताज हॉटेलचे माजी संचालक एच. एन. श्रीनिवास यांनी व्यक्त केले.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट व ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील पीवायसी जिमखाना येथे मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित माहितीपर व्याख्यानात ते बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्यात ताज हॉटेलचे झालेले नुकसान, ताज वर झालेल्या हल्ल्यात जखमी व मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी टाटा ग्रुपने ताज अँड टाटा पब्लिक वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून उचललेली पावले, ते प्रत्यक्ष मदत पोहेचेपर्यंत आलेले अनुभव, ज्यांना मदत करण्यात आली अशांची प्रतिक्रिया अशा विविध घटनाक्रमांची त्यांनी सविस्तर माहिती सांगितली.
याशिवाय कोणत्याही सामान्य मनुष्याकडून अनपेक्षितपणे ‘असामान्य नेतृत्व’ संकटप्रसंगी कसे दिसून येते ते ताज वर हल्ला झाल्यावर तेथील विविध कर्मचाऱ्यांनी प्रसंगी स्वतःचा जीव पणाला लावून अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून दिसून येते, असेही त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.
या कार्यक्रमाला एनआयपीएम पुणे विभागाचे अध्यक्ष उमेश जोशी, एआयएसएसएमएस चे गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य राहुल यादव, व्यवस्थापन समितीचे सदस्य निखिल कणसे, संस्थेचे सहसचिव सुरेश शिंदे यांच्यासह संस्थेच्या विविध विद्याशाखांचे संचालक, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच पुणे जिल्ह्यातील विविध नामांकीत कंपन्यांचे दोनशेहून अधिक मनुष्यबळ व्यवस्थापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनआयपीएमचे सेक्रेटरी नरेंद्र पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. मोनिका राव यांनी केले.