पुणे-पुणे तिथे काय उणे ..म्हणतात ..पण पाण्याचं ऐतिहासिक सौख्य लाभलेल्या पुण्यनगरीत ऑक्टोबर मध्येच पाण्याच्या टंचाईला सामोरे जाण्याची ऐतिहासिक वेळ येवून ठेपली आहे .शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीत गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या पोलिसांच्या नातेवाईकांनी रविवारी सकाळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर मोर्चा नेला. तसेच वसाहतीबाहेर रास्ता रोको आंदोलन केले आहे. बापट यांनी सायंकाळपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे.
खडकवासला कालवा फुटीनंतर शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे शहरातील हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील पूर्व भागातील पाणी पुरवठा तर यापूर्वीपासूनच विस्कळीत आहे. शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये अगोदरपासून अपुरा पाणीपुरवठा होत होता. त्यात गेल्या तीन दिवसांपासून जलसंपदा विभागाने पालिकेचे पंप बंद केल्याने एसएनडीटी टाकीतून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने जंगली महाराज रोड, शिवाजीनगर गावठाण, जनवाडी, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी या परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये तर अत्यंत कमी दाबाने गेल्या ४ दिवसांपासून पाणी येत आहे. अनेक इमारतीमध्ये तर पाणीच आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलीस कुटुंब रविवारी सकाळी रस्त्यावर आले. महिलांनी पुढाकार घेऊन वसाहतीबाहेरील रस्त्यावर बादल्या, हंड्यांसह ठाण मांडले आहे.
दुसरीकडे काही महिला व पुरुष यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा नेला. त्यांनी आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यानंतर गिरीश बापट यांनी सायंकाळपर्यंत टँकरने पाणी पुरविले जाईल असे आश्वासन दिले.