वनराई’चा वर्धापन दिन उत्साहात साजरा…_
पुणे, दि. १० जूलै: ‘खेड्याकडे चला’ या महात्मा गांधींच्या संकल्पनेवर आधारित भव्य प्रदर्शनाचे आयोजन ‘वनराई’च्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले होते. शाश्वत ग्रामीण विकास कसा साधला जाऊ शकतो? सामुहिक शेती, शेती अवजारे, शेती पुरक व्यवसाय, याचे मार्गदर्शक फलक आलेल्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. पाणलोट व्यवस्थापनाचे कार्य कसे राबविले जाते याची माहिती विद्यार्थ्यांसह नागरिकांना कळावी यासाठी भल्या मोठ्या डोगंराची प्रतिकृति तयार करण्यात आली होती. त्यामध्ये अनगड दगडी बांध, सलग समतल चर, गॅबियन बंधारा, सिमेंट नाला बंधारा,वनराई बंधारा असे विविध बंधारे कशा पद्धतीत काम करतात हे प्रदर्शन पहायला आलेल्यांना लगेच समजत होते. प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने बांबूची सायकल, अपारंपारिक उर्जा उपकरण, पर्यावरण पुस्तके, हॅंड ट्रॅक्टर, इलेक्ट्रीक सायकल, घरगुती वापराच्या पर्यावरणपूरक वस्तू नागरिकांना पाहता आल्या.
यावेळी पुण्यातील विविध शाळांतील सुमारे अडिच हजार विद्यार्थ्यांनी पर्यावरण प्रदर्शनाला भेट दिली. याचबरोबर सामाजिक, राजकीय, कृषी, पत्रकारिता, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पर्यावरण प्रदर्शन आणि स्नेहमेळाव्याला आवर्जून हजेरी लावली. पुणे, सातारा, नाशिक, रायगड, रत्नागिरी, जालना अशा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील गावागावांतील कार्यकर्त्यांनी वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी वनराई कार्यालय परिसरात एकच गर्दी केली होती.
कृषी-ग्रामीण विकासाच्या आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला पाठबळ मिळावं या हेतूने ‘स्नेहमिलन आणि पर्यावरण प्रदर्शनाचे’ दरवर्षी वर्धापनदिनी आयोजन करण्यात येते. निसर्ग जाणून स्वत:चेच नव्हे तर देशाचे आणि जगाचे भविष्य वाचविण्यासाठी पर्यावरण प्रदर्शनात विशेष गोष्टी पहायला मिळल्या.
वनराईच्या प्रमुख उद्दिष्ठांनमध्ये ग्रामीण विकासाचे काम अग्रस्थानी आहे, यामध्ये प्रामुख्याने पाणलोट व्यवस्थापन, वृक्षलागवड, शाश्वत शेती, सामुहिक शेती, घनकचरा व्यवस्थापन,पशुधन विकास, शिक्षण व आरोग्यविषयक सोयी-सुविधा, महिला सक्षमिकरण व कौशल्य विकास प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे यंदाच्या वर्धापन दिनी पुण्यात खेडेगावाची प्रतिकृति वनराईतर्फे साकारण्यात आली. वनराईचा गेल्या ३३ वर्षातील प्रवास यानिमित्ताने नागरिकांना पाहता आला. पुण्यातील मित्रमंडळ चौक, पर्वती येथील वनराई संस्थेच्या आवारात हे ‘खेडेगावाच्या’प्रतिकृतीतील प्रदर्शन होते.
भारतभूमी हरित आवरणाने सदैव नटलेली असावी, इथली पडीक जमीन आणि रिकामे हात सदैव उत्पादनक्षम असावेत, स्वच्छ आणि सुंदर परिसर हा इथला प्रत्येकाचा श्वास असावा, इथले जलस्त्रोत शुध्द पाण्याने नेहमीच खळाळत असावेत, आधुनिक विज्ञान-तंत्राज्ञानयुक्त साधनांचा लाभ इथल्या समाजस्तरातील शेवटच्या घटकापर्यंत व्हावा हे पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया तथा अण्णा यांच स्वप्न होते. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं संस्थात्मक रुप म्हणजे वनराई, हि वनराई येत्या १० जूलै २०१९ रोजी ३४ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे.
देशातील पडीक जमिनी उत्पादनक्षम व्हाव्यात आणि देशाच्या हरित क्षेत्रात वाढ व्हावी याकरिता वनराईच्या माध्यमातून शेतकर्यांना आजवर २ कोटीहून अधिक बिया व रोपांचे वाटप केले, तसेच जल-मृद संवर्धनासाठी वनराई बंधा-याची चळवळ उभारली. पाणलोट व्यवस्थापनाबरोबरच चराईबंदी, कु-हाडबंदी, नशाबंदी, नसबंदी व श्रमदान हा ‘पंचसुत्री’ कार्यक्रम राबवला. ग्रामीण भागात १३ प्रशिक्षण केंद्र उभारुन शेतक-यापर्यंत आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान पोहचविले. बचत गटांद्वारे ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला. लोकसहभागातून स्वच्छ, हरित, संपन्न व जलसमृद्ध गावांची निर्मिती केली. यातूनच शाश्वत ग्राम विकासाची गंगा गावागावात वाहू लागली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मराठवाडा अशा विविध भौगोलिक पार्श्वभूमी असलेल्यागावांमध्ये शाश्वत ग्रामीण विकासाद्वारे‘शहरातून खेड्याकडे’ (Reverse Migration) घडवून आणण्यात वनराईने यश मिळवले. वनराईचे उपक्रम स्थानिक ग्रामस्थांचे गरज लक्षात घेऊन आणि ग्रामस्थांच्या सहभागातून राबविले जातात. या सर्व उपक्रामांचा आढावा ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त पहावयास मिळाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी दिली. *यावेळी भाजप प्रवक्ते माधव भंडारी, वनराई संस्थेचे विश्वस्त नितीन देसाई, कमल मोरारका, अविनाश भोसले, रोहिदास मोरे, गिरिश गांधी, गणपतराव पाटील,चंद्रकांत इंगुळकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, तसेच संस्थेचे सदस्य डॉ. जयंत नारळीकर, डॉ. विजय भटकर, डॉ. विजय केळकर, डॉ. माधवराव ताकवले, डॉ. भूषण पटवर्धन, डॉ. चंद्रकांत पांडव उपस्थित होते.