मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
पुणे -महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या दहावी परीक्षेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. माध्यमिक विभागाच्या ३० शाळांमधून ३०२३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी २४१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांचे प्रमाण ८० टक्के इतके आहे. चार विद्यार्थ्यांना ९४ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. ९० टक्केहून अधिक गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांची संख्या ३१ असून, ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवनाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १०३ अशी आहे.
डॉ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन या शाळेचा १०० टक्के निकाल लागला. या शाळेतील ओमकार शिंदे या विद्यार्थ्याला ९६.२० टक्के गुण मिळाले. याच शाळेतील विशाल वसंत चव्हाण ९४.८० टक्के, सैफन सय्यद ९४.८० टक्के आणि कृष्णा भोंडवे ९४.६० टक्के गुण मिळाले. या शाळेतील २२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले तर ४१ विद्यार्थ्यांना ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले.
वसंतदादा पाटील शाळेतील ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे सर्व विद्यार्थी आयआयटी परीक्षेची तयारी करीत आहेत. पहिल्या पाचही विद्यार्थ्यांना इंजिनिअर व्हायचे असून, त्यासाठी ते तयारी करीत आहेत. या विद्यार्थ्यांना कुठलाही खाजगी क्लास लावलेला नव्हता. मुख्याध्यापिका सिमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विणा ढगे, भगवान निर्कड, आसावरी गुमास्ते, विठ्ठल भोकर, आशालता ससाणे, भिमण्णा माळी, मनिषा केंजळे, विलास सुर्वे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
अग्निशमन दलातील कर्मचारी कैलास शिंदे यांनी ४९ व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना ६१.२० टक्के गुण मिळाले. त्यांचा मुलगाही यावर्षी दहावीच्या परीक्षेला होता. त्याला ६५ टक्के गुण मिळाले. पुढे पदवीपर्यंत शिक्षण घेणार असल्याचे मनोगत शिंदे यांनी व्यक्त केले. अग्निशमन दलातील अधिकार्यांचे प्रोत्साहन मिळाला असेही शिंदे यांनी सांगितले.
महापौर मुक्ता टिळक आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या हस्ते आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. , माध्यमिक शिक्षण अधिकारी दीपक माळी यावेळी उपस्थित होते.
स्पर्धेत टिकायचे असल्यास अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. दहावीतील गुणांमुळे आपण जीवनात काही करू शकतो याचा आत्मविश्वास मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करावा. गुणवंत विद्यार्थ्यांना करिअरसाठी महापालीका सहाय्य करेल. महापालिकेतील शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी आठवीपासून विशेष उपक्रम सुरू करून त्यासाठी अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी दिले.