येरवडा मध्यवर्ती कारागृहातील पुरुष बंदीचे कौशल्य प्रशिक्षण वर्गाचा समारोप.
पुणे : कौशल्य प्रशिक्षणाद्वारे आयुष्य सुखकर आणि यशस्वी होण्यास नक्कीच मदत होते, यासाठी बंदी पुनर्वसनासाठी कौशल्य प्रशिक्षण हा अधिक योग्य पर्याय आहे असे मत, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक यु. टी.पवार यांनी व्यक्त केले. बंदी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत टाटा ट्रस्ट व यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे हाऊसकिपींगचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणवर्गाच्या समारोप कार्यक्रमात प्रशस्तीपत्र प्रदान करताना ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, कारागृह ही कैदयांची फक्त शिक्षा भोगण्याची जागा नसून त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्याची त्यांना नवी संधी देण्याची पूनर्वसनाची जागा आहे. कैद्यांना त्यांची चूक सुधारण्याची आणि नव्याने आयुष्य सुरु करण्याची संधी मिळाली पाहिजे, या हेतूने येरवडा मध्यवर्ती कारागृहात अनेक उपक्रम राबविण्यात येतात. शिक्षा संपवून बाहेर पडल्यानंतर त्यांना सन्मानाने जगता यावे,उदरनिर्वाहाचे साधन सहज उपलब्ध व्हावे याकरिता कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून कैद्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्या हस्ते सर्व सहभागी कैदयांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
तर याप्रसंगी उपस्थित यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, सध्याच्या शहरीकरणाच्या काळात मॉल, चित्रपटगृहे, निवासी व व्यापारी संकुले, रुग्णालये, हॉटेल्स इत्यादीमधून मोठ्या प्रमाणात हाऊसकिपिंगसाठीच्या कुशल मनुष्यबळाची गरज असते, अशावेळी कैदयांना या क्षेत्राचे प्रशिक्षण दिल्याने त्यांनाही सहजगत्या रोजगारसंधी उपलब्ध होऊ शकते.यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात एका कैद्याने आपले मनोगतही व्यक्त केले.
याप्रसंगी प्रशिक्षण वर्गातील कैद्यांनी कारागृह आवारातील फुलांचा वापर करून बनवलेले पुष्पगुच्छ पाहून उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. यावेळी ‘यशस्वी’ संस्थेचे प्रशिक्षक रविराज पाठक, टाटा ट्रस्टचे सामाजिक कार्यकर्ता अशोक जाधव, मीनाक्षी बडवाईक, कृष्णा पाडवी यांचाही गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कार्य्रक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी तर आभार प्रदर्शन अंगद गव्हाणे यांनी केले.