पुणे-
संततधार पडणाऱ्या पावसाने पुण्यात जुलैमधील गेल्या दहा वर्षांतील “रेकॉर्ड’ मोडले. यापूर्वी 2014 मध्ये 282.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. या वर्षी जुलैच्या तीस दिवसांमध्ये 359.2 मिलिमीटर पाऊस नोंदला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.सन २००५ नंतर यावर्षी इतक्या मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात पाणी आल्याने नागरिकांत औत्सुक्याचा विषय आहे. अनेक जण नदी किनारी जाऊन पुराचे पाणी पाहण्याचा आनंद लूटताना दिसत आहेत.
सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग वगळता पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांसह विभागातील इतर धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून कोयना धरणात सकाळी ११ वाजेपर्यंत ९४.९४ टिएमसी पाणी साठा झाला असून उजनी धरणातही ८८.७९ टिएमसी पाणी साठा झाला आहे. पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये पाण्याचा मोठा साठा झाला असून भूगर्भातील पाणी साठा वाढण्यास मदत होणार आहे.
या पावसामुळे खरीप पिकांच्या पीकांना नवसंजिवनी मिळाली आहे. काही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे.
पुणे जिल्हा-
पुणे जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे बहुतांश धरणे भरली आहेत. लोणावळा जलाशयात गेल्या पाच ते सहा तासामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. भामआसखेड धरणातून भामा नदीला विसर्ग वाढविण्यात आला आहे. मुळशी धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असून गेल्या 48 तासात 900 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुळशी धरणातून विसर्ग सुरू आहे, चासकमान धरण परिसरात पर्जन्य वाढल्यामुळे भीमा नदीला विसर्ग सुरू आहे.
खडकवासला धरणातून सकाळी 11 वाजल्यापासून विसर्ग सुरू असून पानशेत वरसगाव धरण शंभर टक्के भरल्यामुळे या दोन्ही धरणातून वाढविण्यात आला आहे. एकूणच पुणे जिल्ह्यात दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे बहुतांश धरणे भरली आहेत.
पुणे जिल्ह्यातील ब्रिटिश कालीन भाटघर धरण शंभर टक्केले आहे. धरणाचे सगळे दरवाजे उघडण्यात आले आहे. 8 हजार क्यूसेस पाणी सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शहराच्या पश्चिम क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसाने धरणे भरुन वाहू लागली आहेत. सर्वच धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग चालू आहे. यामुळे मुळा मुठा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. येथील एम आय टी काॅलेजच्या आवारात पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे.
मांजरी येथील पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच लोणी काळभोर येथील एमआयटी संस्थेतील काही भागाला पुराच्या पाण्याने वेढले आहे. थेऊर येथील स्मशानभूमीत पाणी शिरले आहे. कोलवडी थेऊर दरम्यान असलेला मुळा- मुठा नदीवरील पुलास पाणी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एमआयटी कॉलेजच्या इमारती जवळ पाणी साचल्याने महाविद्यालय आवारात तसेच गार्डन परिसरातील ईमारतीना पाण्याने वेढले आहे.
विश्रांतवाडी येथील शांतीनगर वसाहतीत पावसाचे पाणी घुसले आहे. सुमारे 40 घरात हे पाणी घुसले असून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.शनिवारी रात्री झालेल्या पावसाने हा प्रकार घडला आहे. रात्रीपासून या भागात पाणी आल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. दरम्यान, झोपडपट्टीतील घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेकांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले आहे.
इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी गाठली असून रुद्र रूप धारण केले आहे. गेल्या आठवड्यातच इंद्रायणी धोक्याची पातळी गाठून वाहत होती. गेल्या कही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पाणी ओसरत होते पण, पुन्हा पावसाने जोर धरल्याने इंद्रायणीची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
“जलयुक्त शिवार” तुडुंब…
जिल्हाभर सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे गाव शिवारात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेतील नाला खोलीकरण, सिमेंट बंधारे, सिमेंट नालाबांध, ओढा खोलीकरणर, ओढा सरळीकरण, सीसीटी पाण्याने तुडुंब भरले आहेत. गावशिवारातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
दहा वर्षातील रेकॉर्ड मोडला…
संततधार पडणाऱ्या पावसाने पुण्यात जुलैमधील गेल्या दहा वर्षांतील “रेकॉर्ड’ मोडले. यापूर्वी 2014 मध्ये 282.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. या वर्षी जुलैच्या तीस दिवसांमध्ये 359.2 मिलिमीटर पाऊस नोंदला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
आपत्कालीन यंत्रणा सज्ज...
पुणे जिल्या तील पश्चिम भागात सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, टेमघर, पानशेत ही चार धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पुणेकरांना वर्षभराच्या पाण्याची बेगमी झाली आहे. जिल्हृयात सुरू असणाऱ्या पावसाने धरणातून पाणी सोडण्यात येत असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे.
पुणे जिल्हा संक्षिप्त माहिती
पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणी साठा (टीएमसी मध्ये)
टेमघर 3.06 (85 टक्के), वरसगाव 11.99(96 टक्के), पानशेत 10.65 (100 टक्के), पवना8.34 (98.92 टक्के), मुळशी17.91 (97.05 टक्के),चासकमान7.54(99.55 टक्के), भामा आसखेड 7.61(99.29 टक्के), भाटघर 21.87 (93.07टक्के), नीरा देवघर 11.53 (98.29टक्के), वीर 8. 87 (94.26 टक्के), माणिकडोह 5.02 (49.33 टक्के), येडगाव 1.85 (95.28 टक्के), वडज 0.84 (71.64 टक्के), डिंभे 11.84 (94.79 टक्के), घोड 3.40 (66.20 टक्के)उजनी 19.42 ,(36.25)
भामा आसखेड धरण परिसरात अतिवृष्टी चालू असून गेल्या २४ तासात सरासरी170 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. आवक मोठ्या प्रमाणात आहे. भामा आसखेड धरणातून 20527 क्युसेक्स विसर्ग वाढवण्यात आला आहे.
खडकवासला धरणातून विसर्ग चालू असून धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्यामुळे व पानशेत आणि वरसगाव धरणे शंभर टक्के भरली असल्यामुळे त्या दोन्ही धरणातून अनुक्रमे 12936 व 9035 असा विसर्ग चालू असून पावसाचा जोर धरण क्षेत्रामध्ये वाढलेला असल्यामुळे खडकवासला धरणातून एकूण 41756 क्युसेक्स इतका विसर्ग मुठा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
चासकमान धरण परिसरात व भिमाशंकर भागात अतिवृष्टी चालू असून गेल्या २४ तासात ३०० मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. आवक मोठ्या प्रमाणात आहे.
चासकमान धरणातून ५०१२० क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार यानंतर विसर्ग वाढवण्यात येईल. नदीकाठच्या लोकांना त्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.आपले जीविताची व मालमत्तेची काळजी घेण्यात यावी,असा इशारा देण्यात आला आहे.
१५ परदेशी नागरीकांसह गर्भवती महिला व मुलीची सुटका;625 कुटुंबियांचे स्थलांतर
मुळशी धरणाचे पाणी मुळशी तालुक्यातील वाले गावच्या पुलावरुन वाहत असल्याने मानगाव येथे ताम्हिणी घाट मार्गे पुण्याला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पुण्यातील सांगवी-मधुबन सोसायटी भागातून 15 परदेशी नागरीक,1गर्भवती महिला,1स्पेशल मुलगी यांची बोटीच्या साहाय्याने अग्निशामक दल,आपत्ती व्यवस्थापन टीम,पोलीस टीम यांनी सुटका केली मधुबन सोसायटी येथून एका बैलाची पुरातून सुटका करण्यात आली आहे.
सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. महापालिकेच्या नियंत्रण कक्षातील माहितीनुसार आतापर्यंत शहराच्या विविध भागातील ६२५ कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. या कुटुंबांची राहण्याची व्यवस्था स्थानिक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर केली आहे. पाण्यामुळे बाधीत झालेल्या भागांवर लक्ष ठेवण्यात आले आहे. पावसाची परिस्थिती बघता एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यास सांगण्यात आले आहे. हे पथक महापालिकेच्या मुख्य इमारतीत हे पथक तैनात राहणार आहे. गरजेच्या ठिकाणी हे पथक तत्काळ पाठविण्यात येणार आहे.
ठिकाणे आणि स्थलांतरीत केलेल्या कुटुंबाची माहिती.
१) आदर्शनगर, बोपोडी- २६० कुटुंब – राजेंद्र प्रसाद शाळा
२) शांती नगर येरवडा – ३०० कुटुंब- परुळेकर शाळा
३) कामगार पुतळा – १३ नागरिक- दहा नंबर शाळा
४) पाटील इस्टेट – पाच कुटुंब – घोले रस्ता पीएमसी कॉलनी शाळा शिवाजीनगर
५) खिलारे वस्ती- ५० कुटुंब – उपाध्याय शाळा.
सोलापुरातील शेतकर्यांना
दमदार पावसाची प्रतिक्षा
सोलापुरातील सर्व तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. सोलापूरला परतीचा पाऊस पडतो. यंदा परतीचा पाऊस चांगला होईल, असे कृषी विज्ञान केंद्राचे संचालक लालासाहेब तांबडे यांनी सांगितले.
दरम्यान, पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी पुर्वमशागतीची कामे केली आहेत. जलयुक्त शिवार योजनतून झालेल्या विविध जलस्त्रोतात पाणी साठा होण्याची अपेक्षा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी सांगितले.
उजनी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ
सोलापूर जिल्याच्साठी उजनी धरण अत्यंत महत्वाचे असून पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी धरणातील पाणी साठ्यात चांगली वाढ होत आहे. ही सोलापूर जिल्ह्यातील सर्वांना आनंद देणारी बाब आहे. उजनी धरणात आज 88.79 टीएमसी पाणी साठा होता.
वीर धरणातून निरा नदीच्या पात्रात ६० हजार क्युसेस पाणी सोडल्यामुळे नीरा नदीत पाणी आले आहे. वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे निरा आणि भीमा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे दोन्ही नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नीरा नदीचे पाणी नीरा नृसिंहपूर संगम येथून भीमा नदीला मिळते व त्याचा फायदा जिल्ह्यातील भीमा नदीकाठच्या लोकांना होतो. त्यामुळे शेतकरी आनंदी आहेत.
सोलापूर जिल्हा संक्षिप्त माहिती
१) गेल्या २४ तासात पडलेला पाऊस-४.०७ मिलीमीटर
२)आतापर्यंत झालेला पाऊस- ११०.५५ मिलीमीटर
३)धरणनिहाय पाणीसाठा- उजनी धरण ८८.७९ टीएमसी
४)नदीनिहाय पूर परिस्थिती – वीर धरणातील विसर्गामुळे नीरा नदीच्या पात्रात पाणी आले आहे.
५)बाधित गांव,घरांची संख्या – निरंक
६)पूरग्रस्तांची प्रशासनाने केलेली सोय-पूर परिस्थिती नाही
७) जीवित हानी- निरंक
सातारा जिल्हा
कोयनेचे दरवाजे ११ फुटांवर
सातारा जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरण असणाऱ्या कोयना धरणात सकाळी ११ वाजता ९४.९४ टिएमसी इतका पाणी साठा झाला आहे. धरणातील पाण्याची आवक लक्षात घेता कालपासून दोन फुटांवर असणारे धरणाचे दरवाजे रविवारी दुपारी १ वाजता ११ फुटांवर करण्यात आले आहेत. त्यामुळे धरणातून कोयना नदीपात्रात ६५ हजार ५३ क्युसेस पाण्याचा विसर्ग आहे. कोयना व कृष्णा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.