पुणे-सेवाभाव हा प्रत्येक माणसाचा स्थायीभाव आहे. समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने
समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या मर्यादेने संघटीतपणे सेवा केली आणि माझ्या आत्म्याचे समाधान ही
भावना त्यामध्ये ठेवली तर वैभवशाली भारताचे पुनर्निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास
राष्ट्रसेविका समितीच्या पुणे कार्यवाह मीनाताई कानडे यांनी व्यक्त केला.
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरणासाठी शक्ति ही संस्था देशात कार्यरत आहे.
दिनांक २२ मार्च या राष्ट्रीय शक्ति स्थापना दिनानिमित्त शारदा शक्ति या पुणे शाखेतर्फे रविवार दि. २४ मार्च
रोजी सामाजिक योगदान देणाऱ्या औरंगाबादच्या सविता कुलकर्णी यांना शक्ति प्रेरणा पुरस्कार
आणि युवा कर्तृत्वाबद्दल बदलापूरच्या रेश्मा राठोड या युवतीस आय शक्ति सपोर्ट या
पुरस्काराने मीनाताई कानडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. सातत्याने
सामाजिक काम करणारी महिला आणि परिस्थितीशी संघर्ष करीत यश मिळवणाऱ्या युवतीस दरवर्षी पुरस्कार
देऊन गौरविले जाते मानपत्र आणि भेटवस्तू, असे शक्ति प्रेरणा पुरस्काराचे तर प्रशस्तीपत्र, ५००० रुपये रोख
आणि भेटवस्तू असे आय शक्ति सपोर्ट; पुरस्काराचे स्वरूप होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून
महिलांचे सक्षमीकरणासाठी शक्तिही संस्था देशात कार्यरत आहे. ‘शक्ति’च्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.
लीना बावडेकर, शारदा शक्तिच्या अध्यक्षा डॉ. राजश्री कशाळकर या यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या.
मीनाताई कानडे म्हणाल्या, साधू संतांनी आधी केले मग सांगितले. एकनाथांनी काशीची गंगा गाढवाला वाहून
त्याचे प्राण वाचवले. परंतु आज दुर्दैवाने समाजात जाती जातीमध्ये विघटन केले जात आहे. साधू संतांनी
आपली संस्कृती, मानवता टिकवली. आपण संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग, प्रवचने
ऐकतो परंतु त्यांच्या विचारांचा प्रसार करीत नाही. पारायणे करण्यापेक्षा चरित्रे वाचली पाहिजेत. चरित्र नुसते
वाचू नका तर त्यातून बोध घेऊन काहीतरी सेवाभाव अंगीकारा. ज्याठिकाणी गुरांना पाणी नाही त्याठिकाणी
संघटीत सेवेच्या माध्यमातून चारा छावण्या उभारणे, पाणी देऊ शकत नसेल तर त्यासाठी आर्थिक मदत करणे
अशा विविध माध्यमातून आपण सेवा देऊ शकतो. सेवा हा दोन अक्षरी शब्द आहे परंतु त्याची व्याप्ती मोठी आहे
असे त्या म्हणाल्या. आपण काम करतो ते करून दुसऱ्याला मदत करावी. हे करताना माझेच काम मोठे हा
अहंकार त्यामध्ये नसावा किंवा न्यूनगंडही असू नये असे सांगून मीनाताई म्हणाल्या, माझ्या आत्म्याचे समाधान
हीच खरी सेवा आहे या भावनेतून प्रत्येकाने काम केले तर वैभवशाली भारताचे पुनर्निर्माण हे लक्ष्य साध्य
झाल्याशिवाय राहणार नाही.
डॉ. लीना बावडेकर म्हणाल्या, जे जे शर्यतीत धावत असतात त्यांना नेहेमी भीती वाटत असते. मागून
येणाऱ्याला पुढे जाऊ द्यायचे नाही म्हणजे एकतर त्याच्यामध्ये अडथळा आणला पाहिजे अथवा आपली लेन
बदलली पाहिजे अशी वृत्ती समाजात सध्या पाहायला मिळते. मात्र आजच्या पुरस्कारार्थी हे कोणत्याही स्पर्धेत
नाहीत. त्यांची स्पर्धा हे त्यांच्या स्वत:शीच आहे. आपले काम करत त्यांच्या कुटुंबासाठी आणि देशासाठी ते
समर्पित भावनेने काम करतात. प्रत्येक महिलेमध्ये प्रचंड शक्ती आहे. या शक्तीचा उपयोग मीनाताईंनी
सांगितल्याप्रमाणे संघटीत सेवा कार्यासाठी होणे आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या.
सौ. साविताताई कुलकर्णी म्हणाल्या, हा पुरस्कार माझा एकटीचा नसून माझ्या संपूर्ण टीमचा सन्मान आहे.
टीमवर्कमुळेच माझ्या व्यक्तिमत्वामधील ज्या मर्यादा होत्या त्या पूर्ण होऊ शकल्या. सेवाकार्य करताना ज्या
समाजात काम करतो त्याच्या शेवटपर्यंत पोहचावे या भावनेतून काम केले. सेवा घेतो तो कमी व सेवा देतो
म्हणून तो उच्च अशी भावना कधीच असू नये असे सांगून त्या म्हणाल्या, उच्च नीचतेची भावना समाजातून
काढून टाकण्याचे काम आमची संस्था करते.
रेश्मा राठोड म्हणाली, माझे आई-वडील,इतर कुटुंबीय, शिक्षक, प्रशिक्षक यांच्यामुळे खो-खो या खेळामध्ये मी
प्राविण्य मिळवू शकले.
रेश्माचे प्रशिक्षक श्री म्हसकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजश्री कशाळकर यांनी, सूत्रसंचालन स्वाती जोगळेकर यांनी तर आभार सीमंतिनी
वझे यांनी मानले.