पुणे : ”आजची पिढी फेसबुक, व्हॉट्स अॅपवर ‘मदर्स डे’चे सेलिब्रेशन करते. चांगले चांगले कोटस् टाकते. परंतु प्रत्यक्षात घरात त्यातीलच काही लोक आईसोबत एक शब्दही नीट बोलत नाहीत. आपली काळजी करणारे आई-वडील या लोकांना नकोसे वाटू लागतात. ज्या आईने मोठ्या कष्टाने, प्रेमाने आपल्या मुलांचे पालनपोषण केलेले असते. तीच मुले मोठी झाल्यावर आईवडिलांना अपमानित करत असतात. मग केवळ सोशल मिडियावर केलेल्या सेलिब्रेशनचा काय उपयोग? जी भारतीय संस्कृती आई-वडिलांना देवाचे स्थान देते. त्या देशात आज वृद्धाश्रम संस्कृती वाढत आहे. हे या देशाचे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे,” अशा शब्दात प.पु. 108 मुनिश्री पुलकसागर महाराज यांनी आजच्या काळातील वास्तव्याबद्दल खंत व्यक्त केली. तसेच जगात आल्यावर जिचे दर्शन आपल्याला सर्वात आधी घडते ती आईच आपला खरा देव आहे. त्यामुळे तिचा नेहमीच सन्मान करा, असा संदेश सर्व उपस्थित भाविकांना दिला.
सकल जैन वर्षा योग समितीतर्फे मुनिश्रींच्या चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ज्ञानगंगा महोत्सव या मुनिश्रींच्या प्रवचन कार्यक्रमास रविवारपासून (ता.12) प्रारंभ धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे झाला. त्यावेळी ज्ञानगंगा महोत्सवात प्रवचनाचे पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी संयोजक सकल जैन वर्षायोग समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, उपाध्यक्ष अरविंद जैन, चकोर गांधी, अजित पाटील, रांका ज्वेलर्सचे प्रमुख फत्तेचंद रांका, उद्योजक किशोर खाबिया, धारिवाल फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल आदी मंचावर उपस्थित होते. आज या उद्घाटनप्रसंगी 4 हजारहून अधिक जैन भाविक उपस्थित होते.
प्रारंभी रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका आणि त्यांचे कुटुंबीयांनी मुनिश्री पुलकसागर महाराज यांचे पादप्रक्षालन केले. त्यानंतर पुण्यातील जैन जागृती महिला मंच (ज्युनिअर) यांच्यातर्फे मंगलाचरण सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले. यानंतर मुनिश्रींनी ‘माँ से बडा ना कोई’ या विषयावर प्रवचन केले. तसेच प्रत्येकाने घरी गेल्यावर आपल्या आई-वडिलांना नमस्कार करावा व ही चांगली प्रथा रोज चालू ठेवावी असा नियम सर्वांना दिला. सुमारे दीड तास चाललेल्या या प्रवचनास उपस्थित भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला.
मुनिश्रींच्या प्रवचनानंतर मंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते मुनिश्रींच्या 16 पुस्तकांचे प्रकाशन तसेच ‘चातुर्मास 2018’ या फोटो गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी गिरीष बापट म्हणाले, मुनिश्रींचे विचार ऐकून मी अतिशय प्रभावित झालो आहे. चातुर्मासानिमित्त त्यांचे विचार ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे, ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. मुनिश्रींच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न्शील राहील” असे ते म्हणाले.
यानंतर सर्व उपस्थितांसांठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. हा ज्ञानगंगा महोत्सव तीन सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी 8.15 ते 10 यावेळेत रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे होणार आहे. सोमवार दि. 13 ऑगस्ट रोजी ‘अगर भाई ना होता’ मुनिश्रींचे प्रवचन संपन्न होईल. आर एम धारिवाल फाउंडेशनतर्फे आजपासून सलग 3 सप्टेंबरपर्यंत रक्तदान महायज्ञ सुरू झाला आहे. त्यासाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी मोठी आर एम धारिवायल फाउंडेशनची बसही येथे उपलब्ध करण्यात आली आहे.