सासवड -पुरंदर तालुक्यातील नियोजित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. विमानतळ बारामतीला हलवण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बाधित गावातील लोकांना दिल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर सासवड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा सासवड (ता. पुरंदर) येथे पार पडली. यावेळी हा मुद्दा उपस्थित करून राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी थेट उपस्थित जनसमुदायाला साद घालत ‘आपले विमानतळ बारामतीला जाऊ द्यायचे का’ असा खडा सवाल केला. त्यावर उपस्थितांनी ‘नाही, नाही’ अशा जोरदार घोषणा देत पवार कुटुंबियांच्या या भूमिकेला विरोध दर्शवला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या कार्यअहवालात विमानतळाला पाठींबा दर्शवित बाधितांना जास्तीत जास्त पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे बाधित गावातील लोकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेतला होता. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी सुप्रिया सुळे यांना पारगाव येथे नेत कसाबसा समेट घडवून आणण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही. तालुक्यातील इतर गावात हा अस्मितेचा मुद्दा होऊन सुळे यांना याचा फटका बसणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. बारामतीला पाणी पळवण्याच्या मुद्द्यावर आधीच पुरंदर तालुक्यात खदखद असताना आणखी विमानतळ हलवण्याचा विषय समोर आल्याने तालुक्यात रोष निर्माण झाला असल्याचे समजते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात विमानतळाच्या मुद्द्यावर विस्तृत विवेचन केले. २० वर्षापासून विमानतळ इथे करणार, तिथे करणार अशा केवळ घोषणा आघाडी सरकारने केल्या. त्यांच्या बगलबच्च्यांनी जमिनीचे भाव वाढवून पैसे कमवायचे आणि नंतर विमानतळ दुसरीकडे हलवायचे असा कार्यक्रम अनेक वर्ष राबवला. आवश्यक परवानग्या सुद्धा घेतल्या नाहीत. परंतु युती सरकारने पुरंदरची जागा एकदा निर्धारित केल्यावर आम्ही सर्व परवानग्या तर घेतल्याच शिवाय कंपनीची स्थापना करून आर्थिक तरतूदही केली. हे करत असताना बाधित गावांचे कुठलेही नुकसान आणि जोर-जबरदस्ती करणार नसल्याचा आपला शब्द असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे एकूणच पुरंदर तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.