पुणे शहर हे विद्यावंतांचे माहेरघर मानले जाते. गिरीश बापट १९८३पासून पुण्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. आतापर्यंत चारवेळा ते कसबा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. बीएमसीसीसारख्या नामवंत कॉलेजमधून त्यांनी बीकॉमची डिग्री मिळवली आहे. बुधवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन शक्ती फत्ते झाल्याची घोषणा केली. भारताने तयार केलेल्या अॅन्टी सॅटेलाइट मिसाइलने परीक्षणासाठीच तयार केलेल्या भारतीय उपग्रहाचाच नाश केला. डीआरडीओच्या शास्त्रज्ञांच्या या कामगिरीसाठी मोदींनी त्यांचे अभिनंदन केले. पण मोदींनी काय सांगितले हे नीट ऐकून न घेता, कोणत्याही डीआरडीओच्या शास्त्रज्ञाशी चर्चा न करता ,मीडियाचे रिपोर्टही न वाचता बापट यांनी निर्धोकपणे फेसबुक ट्विटरवर पोस्ट केली. शत्रू राष्ट्राच्या टेहाळणी करणाऱ्या उपग्रहाचा भारताने नाश केला असा जावईशोधच त्यांनी लावला. यामुळे सोशल मीडियावर बापटांची प्रचंड खिल्ली उडवण्यात आली. बापटांना बेसिक ही माहित नाही असं म्हणत नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केलं. अनेकांनी त्यांच्या अज्ञानावर बोट ठेवलं. आपली चूक लक्षात आल्यावर बापट यांनी लगेच सोशल मीडियावरची पोस्ट डिलीट केली. पण या चुकीमुळे विरोधकांनी बापट यांच्यावर निशाणा साधला आहे. पुणेकरांनो तुम्ही अशा माणसाला निवडून देणार का असा प्रश्न मनसे नेते सुधीर धवडे यांनी विचारला आहे. तर भाजप नेते प्रसिद्धीसाठी हपापले असून खऱ्या-खोट्याची तपासणीही करत नाही अशी टीका काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी केली आहे.
गिरीश बापटांना बेसिक नॉलेजही नाही, सोशल मीडियावर खिल्ली
पुणे:मिशन शक्ती अंतर्गत भारताने शत्रूचा टेहाळणी करणारा उपग्रह नष्ट केला आहे’, असं अजब विधान करणारे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची बुधवारी सोशल मीडियावर प्रचंड खिल्ली उडवण्यात आली. मुख्य म्हणजे गिरीश बापट विद्येचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरातून यंदा खासदारकीची निवडणूक लढवत आहेत. यामुळे सोशल मीडियावर ते अधिक ट्रोल होत आहेत.