पुणे- आम्ही जुने आहोत ,आमचा हक्क आहे, आम्ही निष्ठावंत आहोत असे सांगणारे अनेक घोडे लोकसभेच्या रणांगणात इच्छुक आहेत ,पण हे बहुतेक सारे आपमतलबी ,संधिसाधू आहेत , गांधी घराण्याच्याच नावावर स्वतःची वाटचाल करणारे आहेत . स्वतः काही योगदान देणारे नाहीत ,ना पक्षासाठी ,ना कार्यकर्त्यांसाठी ते योगदान देतील, अशा इच्छुकांना उमेदवारी दिली तर, कॉंग्रेसला अनुकूल वातावरण असूनही ,पराभव अटळ आहे.. असा आमचा सूर कोणी कॉंग्रेसचे राहुल गांधी ,प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचविला पाहिजे असे मत कॉंग्रेसचे कार्यकर्ते आता माध्यमांपुढे खाजगीत व्यक्त करू लागले आहेत .पुण्यात ना आमच्याकडे म्हणजे कॉंग्रेस कडे सक्षम उमेदवार आहे ,ना भाजपकडे … या दोन्ही पक्षांना सध्या तरी दुसरा कलमाडी बनण्यास निघालेल्या संजय काकडे सारख्याच उमेदवाराशिवाय पर्याय नाही, अन्यथा कोणीही उभे राहील आणि कोणीही निवडूनही येईल, पण असा निवडून येणारा तथाकथित खासदार ना पक्षाचे भले करेल ,ना कार्यकर्त्यांचे भले करेल… जनतेचे तर दूरच राहिले …असा प्रवाद होताना दिसतो आहे .
लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी कॉंग्रेस,भाजप .राष्ट्रावादी कॉंग्रेस या तीनही पक्षांच्या पातळीवर रण सुरु झाले आहे .उमेदवारीबाबत सर्वच पक्षात संभ्रम आहे . भाजप मध्ये विद्यमान खासदाराबाबत त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते अनुकूल नाहीत पण नेत्यांमध्ये या मात्र ‘ते ‘ उपद्रवी नाहीत ना यालाच महत्व दिले जाते आहे. मुख्यमंत्र्यांनी पुण्यात आम्ही सर्व जुन्याच योजना आणीत आहोत हे कबूल केलेलं आहे .पूर्वी या योजनांबाबत राजकारण झाले आणि आता होत नाही, असे त्यांनी म्हटलेले असले तरी हे पूर्ण सत्य नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे .पण मुख्यमंत्र्यांना देखील पुण्यातून कोणी स्वतंत्र मोठा नेता होऊ द्यायचा नसावा ,म्हणून त्यांनी स्वतः चीच पकड पुण्याच्या कारभारावर ठेवली आहे .त्यात जुने -नवे , निष्ठावंत अशा वादाची त्यांच्या या भूमिकेला साथ मिळत गेली आहे . या साऱ्या राजकारणातून दुसरा कलमाडी होण्याच्याच्या मार्गावर असलेल्या संजय काकडे सारख्या राजकारणी नसलेल्या उद्योजकाला निव्वळ वापरून ..वेळेवर दूर ठेवण्याचे षड्यंत्र ,भाजपमध्ये आपल्या प्रचलित धोरणानुसार व्यवस्थित राबविले गेले याकडे लक्ष वेधले जाते आहे . आणि याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे कार्यकर्ते काकडें कडे मोठ्या आशेने पाहत गेले . नुसतीच्या नावाचीच चर्चा झाली नाही, तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचे समूह काकडे यांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या संपर्कात राहिले आहेत . यात कॉंग्रेसच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग आहे .एकीकडे असे चित्र तर दुसरीकडे नेहमीच निवडणुकीत इच्छुक असलेले , पक्षातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्या म्हणून मागण्या करत आहेत. पण हीच मंडळी सुरुवातीला कलमाडींच्या विरोधात मोहीम उघडून बसली होती आणि नंतर त्यांचेच नजीकचे सूत्रधार म्हणून मिरवू लागली होती .
एकंदरीत आता इथे या इतिहासाची उजळणी करणे गरजेचे नसले तरी , इच्छुकांच्या यादीत झळकत असलेली मंडळी उद्या काकडे यांचे नाव जाहीर झाले तर, आपापली बोथट आयुधे त्यांच्या दावणीला बांधून प्रचारमोहिमेत सहभागी होतील, हे भविष्य कोणी वर्तविण्याची गरज नाही .इच्छुकांच्या यादीत झळकणारे चेहरे आणि त्यांच्याकडे असलेले कार्यकर्ते याचा आढावा नेत्यांनी घ्यावा . हे जेव्हा जेव्हा पक्षाच्या कार्यालयात येतात , कार्यक्रम वा सभेला येतात तेव्हा तेव्हा पाहुण्यासारखे एकटे दुकटे येतात . ना सभेला ,बैठकीला येताना यांच्या बरोबर कार्यकर्ते असतात ना एरवी असतात . कार्यकर्त्यांचा समूह सांभाळणे यांना जमत नाही ते एकटे दुकटे वावरणारे इच्छुक निव्वळ कॉंग्रेसला अनुकूल वातावरणाचा ,गांधी घराण्याच्या नावाचाच उपयोग करवून घेत पक्षात ठाण मांडून आहेत . अशा कार्यकर्त्यांमुळे च कॉंग्रेसचे सर्वाधिक नुकसान झाले आहे हा इतिहास आहे .धम्मक असलेला , कार्यकर्त्यांचा मोठा समूह स्वबळावर सांभाळू शकणारा आणि स्वबळावर देखील काही करू शकणारा असा खमक्या कार्यकर्ता असेल तर नेत्यांनी अशा कार्यकर्त्याला पक्षाचे आणि गांधी घराण्याच्या नावाचे बळ दिले तर पुण्यात कॉंग्रेसचा खासदार होणे कठीण नाही . आणि अशी व्यक्ती सध्या इच्छुकांच्या यादीत नाहीच असा दावा हि कार्यकर्ते करीत आहेत . मात्र काकडे यांच्याकडे कॉंग्रेसचे कार्यकर्ते त्याच दृष्टीने पाहत आहेत .आणि गर्दीही करीत आहेत .पण काकडे लाऊन बसले होते भाजपची आस …खुद्द काकडे यांनी आपल्याला भाजप उमेदवारी देईल असा दावा केला होता . पण आता त्यांचा भाजपकडून भ्रम निरास होत आहे आणि याचा फायदा कॉंग्रेसचे कार्यकर्ते घ्यायला उत्सुक आहेत .काकडे हे भाजपच्या ९७ नगरसेवकांपैकी ५० नगरसेवक फोडून कॉंग्रेस मध्ये त्यांना आणू शकतात ,त्या बळावर महापालिका भाजपच्या हातातून जाईल आणि लोकसभेची जागा देखील येथील सहजगत्या कॉंग्रसकडे पुन्हा येईल. लोकसभेला असलेल्या इच्छुकांसारखे नेते लाभल्याने शहरात सध्या कॉंग्रेस पेक्षा राष्ट्रवादीचे मोठे प्राबल्य आहे. इथे अजित पवारांचे स्वतःचे लक्ष आहे .अजित पवार आणि सुरेश कलमाडी असा नेतृत्वाचा वाद पुण्याने पाहिला आहे. अंकुश काकडे आणि राष्ट्रवादी समर्थकांनी कलमाडी हाऊस समोर घातलेला गोंधळ आणि त्याचा कलमाडी समर्थकांनी केलेला सामना राजकीय समीक्षकांनी आणि पुण्यान पाहिला आहे. त्यानंतर अजित पवारांनी सपत्नीक कलमाडी हाऊस वर घेतलेले स्नेहभोजन देखील अनेकांच्या स्मरणात असेल . आता कॉंग्रेस कडे असा प्रबळ नाहीच तर सारे लोकसभेला असलेल्या इच्छुकांसारखे नेतेच उरल्याने शहरात राष्ट्रवादीचेच मोठे प्राबल्य आहे . राष्ट्रवादीच्या सभांना होणारी गर्दी आणि कॉंग्रेसच्या सभांना होणारी गर्दी सारे काही चित्र स्पष्ट करणारी आहे. कॉंग्रेस मध्ये सर्वच नेते झाले आणि एकमेकांचे पाय खेचू लागल्याने कॉंग्रेसची अवस्था मोठी दयनीय झाली आहे . कॉंग्रेसच्या शर अध्यक्षाला देखील न जुमानता स्वतः च नेते असल्याच्या अविर्भावात एकटे दुकटे फिरणारे कॉंग्रेसचे भवितव्य उज्वल करू शकणार नाहीत तर कलमाडी नसल्याने आता काकडेंच्या रूपातच दुसरा कलमाडी घडविण्याची वेळ आली आहे याचा राहुल गांधी आणि अशोक चव्हाण यांच्या सारख्या नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे असा मोठा प्रवाह कॉंग्रेस मध्ये आहे.