पुणे- आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने राजकीय प्रचाराचा धुराळा उडविण्यासाठी भूमिपूजनांची मोहीम सुरु केली असली तरी या मोहिमेच्या प्रारंभीच..शिवसेनेचा बहिष्कार आणि पुण्यातील पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास खासदार काकडे यांच्या अनुपस्थितीने..म्हणजेच जणू ‘अघोषित बहिष्कार’ पाहून ‘काळाच्या उलट्या पावलांची चाहूल ‘ अजूनही भाजपने समजावून घ्यावी असं मत व्यक्त करायला राजकीय समीक्षकांनी सुरुवात केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो ३ मार्गिकेचे आज (मंगळवार) भूमिपूजन झाले. मात्र,या कार्यक्रमातच आगामी निवडणुकीच्या राजकारणात भाजपच्या ‘ काळाच्या उलट्या पावलांची चाहूलं’ समीक्षकांना जाणवली . पहिल्यांदा महापौर टिळकांना त्यांचे नाव पत्रिकेत न छापता अवमानाला सामोरे जावे लागल्याची घटना सामोर येते ना येते तोच , पुण्यातील महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी ज्यांचं मुख्य सहाय्य घेतलं गेलं आणि त्यानंतर ज्यांचा पुण्याचे दुसरे सुरेशभाई असा पुण्यातील राजकारणात उल्लेख होऊ लागला त्या ,राज्यसभा सदस्य असलेल्या भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचे नाव देखील निमंत्रण पत्रिकेतून वगळल्याने ,त्यांची नाराजी त्यांच्या अनुपस्थितीतून स्पष्ट दिसून आली . त्यांची ही नाराजी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या पथ्यावर पडून आगामी काळात भाजपची उलटी गणती सुरु होऊन भाजपला मोठा झटका बसू शकतो असा राजकीय समीक्षकांचा दावा आहे. भाजपने काकडे यांना ‘सबसे बडा खिलाडी ‘ बनण्यापासून रोखण्याची प्रक्रिया सुरु ठेवली असताना पुण्याने आम्हाला तसं काही दिलं नाही सांगणारे शरद पवार हे आपल्या दुसऱ्या ‘खिलाडी’ ची निर्मिती करू शकतात याकडे लक्ष वेधले जाते आहे .
दरम्यान अगदी ‘कोती’ बुद्धी ठेऊनच ..राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले गेले नव्हते. त्यामुळे तेही या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने याचा निषेध केला आणि कार्यक्रमावर बहिष्कार टाकला . या पूर्वीच्या पुण्यातील पंतप्रधानांच्या कार्यक्रमात शिवसेनेचे मंत्री शिवतारे यांना डावलण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्यांनी ..बापटांची चरबी उतरवू .. अशी भाषा करत दम भरला होता . हा मागचा अनुभव असतानाही मुंबईतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या नेत्यांना निमंत्रण नसल्याने नाराजी असल्याचे वृत्त होते.पुण्यातही शिवसेनेने मोदी यांच्या कार्यक्रमावर आज बहिष्कार घातला .5 राज्यातील निवडणुकांचा कौल लक्षात घेऊन देखील भाजपची सुरु असलेली हि वाटचाल पायावर धोंडा पडून घेणारी ठरेल असा अनेकांचा दावा आहे .