पुणे : इतिहास शिवाजी महाराज, बसववेश्वर, राणी लक्ष्मीबाई, रामानुजाचार्य…यांचा आदर्श घेत त्यासाठी इतिहास, परंपरा, संस्कृती जपून आपला पाया बळकट केला पाहिजे. त्यातून एकात्मता वाढत राहील. पुढील पिढी बळकट होईल. ‘इन्फर्मेशन विदाऊट कन्फर्मेशन इज अॅम्युनेशन’ असे म्हणत भारत विश्व गुरू आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी केले.
पुण्यभूषण फाऊंडेशन'(त्रिदल पुणे)च्या वतीने दिला जाणारा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ २०१९ ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांना बालगंधर्व रंगमंदिरात प्रदान करण्यात आला. यावेळी उपराष्ट्रपती बोलत होते. व्यासपीठावर डॉ. शां.
ब. मुजुमदार, चंदू बोर्डे, डॉ. प्रभा अत्रे, डॉ. के. एच संचेती उपस्थित होते.
उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, पुणे हे ऐतिहासिक, सुंदर शहर आहे. पुणे सांस्कृतिक केंद्र आहे. पुणे हे समता आणि स्वातंत्र्य लढ्याचे केंद्र राहिले आहे, असे सांगून उपराष्ट्रपतींनी इतिहासातील महनीय पुणेकरांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. सेवा वृत्तीचा, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्याचा हा सोहळा महत्वपूर्ण आहे. पुण्यभूषण पुरस्कार प्राप्त प्रत्येक पुणेकरांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे.
पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी असून मोठा वारसा लाभला आहे. भविष्यातील पिढीला पुरातत्वबाबत माहिती असायला हवी, यासाठी त्याची जपणूक करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. आज देशातील ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षाखालील आहे. जगातील मोठ्या आणि नामवंत संस्था देशाकडे तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून पाहत आहे. यासाठी आपापसांतील हेवेदावे, मतभेद विसरून एक देश, एक व्यक्ती हीच आपली पद्धत असायला हवी. विविधतेत एकता असलेला भारत देशाचा प्रत्येकाला भारतीय असल्याचा गर्व असायला हवा.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘मराठवाडयातून आलेल्या माझ्यासारख्याला पुण्यभूषण पुरस्कार मिळाल्याने पुरस्काराचे कार्यक्षेत्र वाढल्याचा आनंद आहे. ज्ञानाची मशागत व्यासंगाने करीत राहिले पाहिजे. नवा इतिहास प्राचीन गोष्टी पुढे आणण्याचा आमचा प्रयत्न असतो.’ मातीत जन्मती, मातीत मरशी, या उक्तीला जोडून मातीत उत्खननास जुळशी ‘ अशी ओळ मला जोडावीशी वाटते. भारतीय संस्कृतीत मंदिर स्थापत्य, मूर्तिशास्त्राला महत्त्व असते. मंदिर ही सामाजिक व्यवस्था आहे.’
पुरस्काराचे यंदाचे ३१ वे वर्ष होते. डॉ. देगलूरकर यांच्यासह वीरमाता लता नायर, मोहम्मद चांदभाई शेख, नाईक फुलसिंग, हवालदार गोविंद बिरादार यांचा देखील पुण्यभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. डॉ. प्रभा अत्रे यांनी आभार मानले.