पुणे :पुणे शहराची कचरा समस्या ,संभाव्य उपाय ,नागरिकांचा सहभाग ,स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाचे प्रयोग अशा अनेक पैलूंचा उहापोह करण्यासाठी आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कटिबद्ध होण्याचा निर्धार करण्यासाठी ‘शिवप्रजाराज्यम संघटना’,’माय अर्थ फाउंडेशन ‘, एन्व्हायर्नमेंट क्लब ऑफ इंडिया ‘ यांच्यातर्फे कचरा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .’पालिकेच्या कचरा प्रकल्पांवर श्वेतपत्रिका यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केली तर स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल होण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे आणि प्रशासन प्रामाणिकपणे कार्यरत असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी या परिषदेत सांगितले .
पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृह येथे ही परिषद झाली .परिषदेला पुणेकर नागरिकांची चांगली उपस्थिती होती .
रवींद्र धारिया (अध्यक्ष ,वनराई), ज्ञानेश्वर मोळक (सह आयुक्त , पुणे मनपा ),विवेक वेलणकर ( सजग नागरिक मंच ),नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे , सचिन निवंगुणे (पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटना ),ललित राठी (कचरा व्यवस्थापन तज्ज्ञ ), नीलेश इनामदार ( एन्व्हायर्नमेंट क्लब ऑफ इंडिया ), विलास लेले ( ग्राहक पंचायत ), अॅड. अनिरूद्ध कुलकर्णी यानी परिषदेत विचार मांडले .
‘वनराई ‘चे अध्यक्ष रवींद्र धारिया म्हणाले, ‘ कचरा समस्येचे मूळ हे स्वच्छतांच्या सवयींशीसुध्दा निगडीत आहे. हव्यासामुळे पर्यावरणाचा नाश होत आहे. पुण्याच्या लोकसंख्येला साजेसे कचरा व्यवस्थापन करणे आव्हानात्मक काम आहे.सर्वांच्या प्रयत्नांनी ते शक्य आहे.त्यासाठी जनजागृती करण्याचा कचरा परिषदेच्या संयोजकांचा प्रयत्न महत्वाचा आहे . ‘
विवेक वेलणकर म्हणाले, ‘पालिकेच्या कचरा व्यवस्थापन कामाचा लेखाजोखा घेतला पाहिजे. पुणेकरांचा वचक, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर नाही.२५ हून अधिक प्रकल्प होऊनही समस्या सुटली नाही.कोटयवधी रुपये वाया गेले. या सर्व गोष्टींची श्वेतपत्रिका आणायची गरज आहे. सल्लागारांवर कोटयवधी खर्च केले जातात. जुने प्रकल्प वाऱ्यावर सोडून नवे आणले जातात. महापालिका स्वतःची जबाबदारी नागरिकांवर झटकून टाकत आहे .इंदोर चा स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक येतो ,आणि पुण्याचा येत नाही ,कारण इंदुरप्रमाणे पुण्यातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सकाळी रस्त्यावर कचरा व्यवस्थापनसाठी उपस्थित नसते .
पालिकेचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक म्हणाले. २१०० मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. त्यातील १४०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.पुणे पालिका प्रामाणिकपणे कचरा समस्येवर काम करू इच्छित आहे. माझ्या कारकिर्दीत नागरिकांशी संवाद ठेऊन समस्येला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. नागरिकांची मानसिकता सकारात्मक करण्याची आवश्यकता आहे. स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल होण्याचे प्रयत्न सुरु आहेत.ओला- सुका कचरा वर्गीकरणाची जबाबदारी नागरिक पार पाडणार की नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे.
नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे ही सभागृहात उपस्थित होत्या.त्या म्हणाल्या ,’नागरिकांचा सहभाग मिळवून सातत्याने प्रयत्न केल्याने आमच्या प्रभागात ३६ कचरापेट्या काढण्यात यश मिळाले आणि घरोघरी कचऱ्याचे वर्गीकरण होऊ लागले .ओल्या -सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण ही दैनंदिन सवय बनली पाहिजे . पालिका कर्मचाऱ्यांसमवेत मी नगरसेवक या नात्याने रोज सकाळी रस्त्यावर कामाची देखरेख करते . देशभरात कचरा निर्मूलनाच्या चांगल्या प्रयॊगातून नवे उपाय शिकत राहते ‘
सचिन निवंगुणे म्हणाले, ‘ पूर्वी शहरातील कंपोस्ट झालेला कचरा शेतीसाठी नेला जायचा. प्लास्टिक हे पुण्यातील कचऱ्यात मिसळल्याने शेतकऱ्यांनी कंपोस्ट खत म्हणून नेणे बंद केले. पुण्यात कचरा साठून राहत आहे.पन्नास मायक्रॉन जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आल्याने प्लास्टिक वाढलेच आहे. फक्त दंडात्मक कारवाईची सोय म्हणून दुकाने आणि व्यापाऱ्यांकडे पाहिले जाते.
नीलेश इनामदार म्हणाले, ‘ प्लास्टिक पासून इंधन तयार करणे शक्य आहे. घरोघरी कचऱ्याचे वर्गीकरण, विघटन करुन बागांसाठी वापरता येईल.अनेक नवी संशोधने घरच्या कचरा व्यवस्थापन करण्यासाठी आहेत .त्याचा उपयोग केला पाहिजे .
‘कचरा आणि प्लास्टिक व्यवस्थापन करताना त्याकडे समस्या म्हणून पाहता कामा नये. सर्व समाज एकत्र येऊन मॉडेल उभे केले पाहिजे ‘ , असे विचार ललीत राठी यांनी व्यक्त केले.
प्रारंभी कचरा समस्येवर पथनाट्य सादर करण्यात आले . शेवटी कचरा व्यवस्थापन ,शहर स्वच्छतेची सामूहिक शपथ घेण्यात आली. परिषदेचे संयोजक अनंत घरत यांनी प्रास्ताविक केले .