दिवाळी अंकाचे पावित्र्य पुणेकरानी टिकवले : खा. नारायण राणे
पुणे :
‘दिवाळी अंकाचे पावित्र्य पुणेकरानी टिकवले. पुणेरी संस्कार, घटना, इतिहास याची नोंद ‘ पुण्यभूषण ‘ दिवाळी अंक घेतो, त्यामुळे हा अंक वैशिष्टयपूर्ण आहे ‘ , असे उद्गार माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी काढले.
‘तिरकस पुणेकरांनी सरळ पुणेकरांवर काढलेल्या दिवाळी अंक’ अशी ख्याती असलेल्या ८ व्या ‘पुण्यभूषण’ दिवाळी अंकाचे प्रकाशन आज शुक्रवार, दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झाले. यावेळी नारायण राणे बोलत होते.
माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे, सहकारी बँकिंग तज्ञ बाळासाहेब उर्फ विद्याधर अनास्कर , अमेरिकास्थित पुणेकर डॉ. सुरेश तलाठी ज्येष्ठ साहित्यिक मुकुंद टाकसाळे, सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले.
महावीर जैन विद्यालय पटांगण येथे, बी एम सी सी कॉलेज शेजारी हा कार्यक्रम झाला .
सुरुवातीला विठ्ठल काटे, सुमन काटे, मकरंद टिल्लू यांनी हास्ययोग सादर केले. अप्पा कुलकर्णी यांनी शीळ वादन केले.
नारायण राणे म्हणाले, ‘ राजकारणी माणसाला समोर माणसे लागतात. आज माणसे पावसामुळे व्यासपीठावर आहेत. पण, कोणी घरी गेले नाही.
पुण्यात ‘पुण्यभूषण ‘ला इतिहास आहे.दिवाळी अंकाचे पावित्र्य पुणेकरानी टिकवले. पुणेरी संस्कार, घटना, इतिहास याची नोंद हा अंक घेतो, त्यामुळे हा अंक वैशिष्टयपूर्ण आहे. त्याच त्याच गोष्टींकडे पुणेकर ढुंकून पाहत नाही, म्हणून डॉ. सतीश देसाई यांनी सतत नवनव्या गोष्टी सुरू केल्या. पुण्यभूषण अंकाने पुणेकरांच्या चांगल्या गोष्टी पुढे आणल्या. आणि स्वतःला चांगले म्हटलेले पुणेकरांना आवडते.. !
अनासकर यांनी खडतर परिस्थितीतून पुढे येऊन कर्तुत्व गाजवले. मैत्रीचे पावित्र्य राखणारा माणूस म्हणजे बाळासाहेब अनासकर असे मी मानतो. बाळासाहेब अनासकर हे चालते बोलते विद्यापीठ आहे.
मुकुंद टांकसाळे यांनी पुणेरी वातावरणाचे नर्मविनोदी शैलीत किस्से सांगितले.विद्याधर अनासकर यांनी आयुष्यातील यशाचे श्रेय आईला दिले .
यावेळी युवराज शहा यांनी घेतलेल्या नारायण राणे यांच्या मुलाखतीतुन राजकीय फटकेबाजी उपस्थितांना अनुभवता आली.
‘पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले. मकरंद टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले.
पुण्यभूषण ‘ च्या या वर्षीच्या अंकाचे पहिले पान बाळासाहेब उर्फ विद्याधर अनास्कर यांना समर्पित करण्यात आले आहे. पाच पुणेकरांना त्यांच्या कर्तत्वाबद्दल, योगदानाचा उल्लेख करुन ‘सन्मान’ पानावर स्थान देण्यात आले आहे.
अधिक माहिती :
२०१७ साली पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या पदाधिकार्यांच्या हस्ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रकाशन समारंभ झाला होता. २०१६ मध्ये दिवाळी अंकाचे वितरण पोस्टाद्वारे करणार्या पोस्टमन काकांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. २०१६ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण परंपरा असलेल्या ‘पक्क्या’ पुणेकरांच्या हस्ते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते.
पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर पुणेकरांनी पुणेकरांसाठी ’दिवाळी अंक’ काढण्याची संकल्पना ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’ने प्रत्यक्षात आणली. या अंकाला दरवर्षी दर्जेदार अंकांसाठी अनेक पारितोषिके मिळत असतात, अशी माहिती डॉ. सतीश देसाई यांनी दिली.