मोदी सरकारची धोरणे शेती विरोधी : आमदार जयंत पाटील यांची मोदी सरकारवर सडकून टीका
पुणे :’ शेतकरी माझा मतदारच नाही ‘ असे खासगीत सांगणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारची शासकीय धोरणे शेती विरोधी आहेत. शेतकरी मंत्रालयात येऊन आत्महत्या करीत आहे, हे चुकीचे घडत आहे.पुढील काळ शेतीला कठीण असल्याने जागरूक राहून शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी मोठे काम उभे करावे, लागणार आहे. त्यासाठी कृषी पदवीधर संघटनेला शेकाप मदत करेल ‘ असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केले.
‘ कृषी पदवीधर संघटना ‘ आयोजित ‘ युवा प्रताप ‘ या राज्यस्तरीय कृषी व सामाजिक पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने जयंत पाटील बोलत होते.
कृषी पदवीधर संघटना आयोजित ’युवा प्रताप पुरस्कार’ वितरण सोहळा 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.
पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष होते.
पुरस्कारांचे वितरण आमदार प्रताप पाटील-चिखलीकर, डॉ.राम खर्चे , पुणे जि.प. अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या उपस्थितीत झाला. ’शेतकरी कामगार पक्षा’चे चिटणीस प्रवीण गायकवाड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
जयंत पाटील म्हणाले, ‘ यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून शेती आधारित अर्थकारण उभे राहिले. या राज्याचा विकासच शेतीमुळे झालेला आहे. आता शहरीकरण ६० टक्क्यांवर जाणार आहे. अशा वेळी शेतीचे उत्पादन वाढवून माल विक्रीची केंद्रे कृषी पदवीधरांना उपलब्ध करून दिली पाहिजेत.
कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष महेश कडूस-पाटील , राम खर्चे, अशोक पाटील -झरेकर, गणेश सावळे, विनायक काशीद, संजय गडगे, संग्राम बुचडे, मंगला कडूस उपस्थित होते.
प्रगतीशील शेतकरी, उद्योजक, कृषी संशोधक, कृषी शिक्षक, महिला सक्षमीकरण क्षेत्रातील कार्यकर्ते, कृषी विषय हाताळणारे पत्रकार अशा 48 व्यक्ती आणि संस्थांना या सोहळ्यात गौरविण्यात आले.
इस्त्रायल , सिक्किम च्या धर्तीवर राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याच्या कृषी क्षेत्राला कसे पुढे नेता येईल आणि शेतीत उत्साह निर्माण करण्यासाठी काय करता येईल, याबाबत या सोहळ्यात मार्गदर्शन करण्यात आले.